Pulses Stock Limit : केंद्र सरकारकडून डाळींच्या साठ्यावरील निर्बंध मागे
डाळींच्या साठ्यावरील निर्बंध केंद्र सरकारनं मागे घेतलेत. साठवणुकीच्या मर्यादेतून डाळ आयातदारांना सूट देण्याचं सरकारनं जाहीर केलं. याशिवाय डाळ मिलचे मालक आणि घाऊक विक्रेत्यांसाठी केंद्रानं निकष शिथिल केले आहेत. त्यामुळे आता घाऊक विक्रेत्यांसाठी 500 टन इतकी साठवणुकीची मर्यादा असेल. मिलमालकांसाठी हीच मर्यादा 6 महिन्यांच्या उत्पादनाइतकी किंवा वार्षिक क्षमतेच्या 50 टक्के यापैकी जी अधिक असेल ती इतकी राहील. किरकोळ विक्रेत्यांसाठी डाळ साठवणुकीच्या मर्यादेत बदल नसून 5 टन इतकीच मर्यादा असेल. आता केवळ तूर, उडीद, चणा आणि मसूर डाळीसाठी साठा करण्यावरील मर्यादा 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहेत. तरी, संबंधितांना त्यांच्याकडील डाळींचा साठा ग्राहक व्यवहार विभागाच्या पोर्टलवर जाहीर करावं लागणार आहे.






















