India Inflation : देशात महिनाभरात महागाई 6.15 टक्क्यांवरून 7.79 टक्क्यांवर ABP Majha
देशात महागाईचा भडका उडालाय आणि गेल्या आठ वर्षातला उच्चांक गाठलाय. एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर ७.७९ टक्के इतका पोहोचला. त्यातच अन्न-धान्य आणि खाद्य महागाईचा दर ८.३८ टक्क्यांपर्यंत गेल्यानं याची झळ सर्वसामान्यांनाही बसतेय. मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.१५ टक्के इतका होता. तो महिनाभरात दीड टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. वर्षभराचा विचार करता खाद्य महागाईचा हाच दर गेल्या एप्रिलमध्ये केवळ १.९६ टक्के इतका होता. गेले चार महिने महागाईची ही विक्रमी वाढ रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षाही अधिक आहे. आरबीआयनं ६ टक्के मर्यादा निश्चित केली आहे. खाद्यतेलाच्या दरात झालेली भरमसाट वाढ, रुपयाची घसरण आणि इंधनाच्या किमती वाढल्यानं महागाईचा आगडोंब उसळला आहे.



















