Farmer Protest | 8 तारखेला देशव्यापी बंदची शेतकऱ्यांची हाक,सुधारणा नको, कायदे मागे घेण्याची मागणी
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेलं शेतकरी आंदोलन आता नवव्या दिवसात पोहचलं आहे. काल विज्ञान भवनमध्ये शेतकरी आणि सरकारमध्ये तब्बल 7 तास चर्चा चालली. या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचं मान्य करताना दिसतंय. त्यामुळे आता नेमका कुठल्या गोष्टीबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचं असेल. कृषी विधेयकांवर सरकार अखेर थोडीशी नरमाईची भूमिका घेतंय, असं चित्र कालच्या बैठकीनंतर दिसू लागलंय. ज्या एमएसपीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना सर्वाधिक धास्ती आहे, ती व्यवस्था कायम राहावी यासाठी सरकार एखादं नवं विधेयक आणू शकते. शिवाय सध्याच्या कायद्यातही काही बदलांबद्दल सरकार विचार करतंय. बैठकीनंतर कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या वक्तव्यातच याचे संकेत दिसतायत.



















