ममता बॅनर्जींचा भाषण करण्यास नकार, भर कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या, काय होतं कारण?
कोलकाता: नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित 'पराक्रम दिवस' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी झालेल्या गोंधळामुळे त्या नाराज झाल्या आणि त्यांनी भाषण देण्यास नकार दिला.
केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने कोलकात्यात या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भाषणाला उभ्या राहताच व्यासपीठाच्या खाली बसलेल्या काही लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावर ममता बॅनर्जी नाराज झाल्या. त्या म्हणाल्या की, "हा सरकारचा कार्यक्रम आहे, कोणत्या राजकीय पक्षाचा नाही. त्यामुळे कोणाला बोलावून अपमानित करणे ठीक नाही."






















