(Source: ECI/ABP News)
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
मुंबई : देशातील 5 राज्यात झालेल्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांच्या निकालानंतर भाजपने (BJP) देशभरात जल्लोष सुरू केला असून मुंबईसह महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांनी देखील आनंदोत्सव केला. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनीही एकत्र येत रसगुल्ला वाटून विजयोत्सव साजरा. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी येथून विजयबद्दल आनंद व्यक्त करत हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याचं म्हटलं. महाराष्ट्रातील जवळपास 6 हजार बंगाली कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन रात्रंदिवस काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जो विजय मिळाला, तो राष्ट्रीयत्त्वाचा विजय आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं. तर, हे परबोर्तन नसून महापरिबोर्तन असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
मी जेव्हा बंगालमध्ये गेलो होतो, त्यावेळी एका पत्रकाराने मला विचारलं की, निवडणुकांवेळी ममता बॅनर्जी म्हणतात भाजपचे लोक हे पश्चिम बंगालच्या बाहेरचे आहेत. मात्र, मी पत्रकारांना सांगितली की, भाजपची स्थापना ज्यांनी केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच पश्चिम बंगालचे होते, त्यामुळे खऱ्या बंगालचा पक्ष कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आज बंगलाच्या जनतेनं दीदींना दाखवून दिलं, बंगालचा खरा पक्ष कोणता आहे. बंगालच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन बंगालमध्ये पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन करुन दाखवलं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.




















