पुन्हा 'दादा' पॅटर्न! 'कुणाचीही सत्ता असो, उपमुख्यमंत्री अजितदादाच!', काय म्हणाले चंद्रकांतदादा?
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर | 15 Apr 2021 11:21 PM (IST)
पंढरपूर : अजित पवार यांना सध्या काय झालाय माहित नाही पण फारच जोरात सुटलेत आणि त्यांची जीभही घसरत चाललीय, म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. सिंचन घोटाळा, शिखर बँक प्रकरण यांची चौकशी असताना अजित पवार कशाच्या जीवावर बोलत आहेत, हे कळत नाही असं सांगत सध्या राष्ट्रवादीचे काही मंत्री सुपात तर काही जात्यात आहेत, असं सूचक वक्तव्यही चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. एकंदरीत पुन्हा एकदा भाजपने सिंचन घोटाळ्याचा ससेमिरा अजित पवार यांच्या मागे लावायच्या हालचाली सुरु केल्याचे संकेतच चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. एकाबाजूला अनिल देशमुख यांची सीबीआयकडून कालच 10 तास चौकशी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याची आठवण करून दिली आहे.