IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी 20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तर, टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 8 मार्चला गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जाऊन पाहायचं तुमचं नियोजन असेल तर एक चांगली संधी आहे.
भारत इंग्लंड सामन्याचं तिकीट कुठं मिळणार?
टी 20 वर्ल्ड कपच्या सामन्यांची तिकीटं बुक माय शो या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. अतिरिक्त तिकीटांची विक्री करण्यात येणार असल्याचं बुक माय शोकडून सांगण्यात आलं आहे. आज सायंकाळी 6 वाजता ही विक्री सुरु होईल. बुक माय शोच्या वेबसाईटवरील माहितीनुसार एका तिकिटाची किंमत 1000 रुपये असेल. ज्या चाहत्यांना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जाऊन उपांत्य फेरीतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पाहायला असेल ते बुक माय शोच्या वेबसाईटला भेट देऊन तिकीट बुक करु शकतात.
बुक माय शोची पोस्ट
Additional tickets for the Semi Final 2 of the ICC Men’s T20 World Cup go live at 6 PM today! pic.twitter.com/1cGJTDTaai
— BookMyShow (@bookmyshow) March 4, 2026
भारताच्या संघातील काही खेळाडूंनी आज मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात ज्यांना संधी दिली त्यांच्यासह मैदानात उतरणार की संघात काही बदल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारत की इंग्लंड कोण वरचढ?
टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड 5 वेळा आमने सामने आले आहेत.भारतानं तीनवेळा विजय मिळवला तर इंग्लंडनं दोन वेळा विजय मिळवला. पाच पैकी 2 वेळा भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत आमने सामने आले. इंग्लंडनं 2022 मध्ये भारताला 10 विकेटनं पराभूत केलं. तर 2024 मध्ये भारतानं उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केलं.त्या विजयासह भारतानं बदला पूर्ण केला होता.
टी20 मध्ये हेड टू हेड
आंतर्राष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड 29 वेळा आमने सामने आले आहेत. भारताने 17 वेळा विजय मिळवला तर इंग्लंडने 12 वेळा विजय मिळवला आहे. 2026 टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांची कामगिरी सारखीच राहिली आहे. दोन्ही संघानी 7- 7 सामने खेळले आहेत. यात दोन्ही संघांचा एकदा पराभव झाला आहे. भारत ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या स्थानावर होता. तर, इंग्लंड सुपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये पहिल्या स्थानावर होता. दोन्ही संघांची कामगिरी सारखीच दिसत असली तरी जुनी आकडेवारी भारताच्या बाजूने आहे.
भारताचा संपूर्ण संघ- (Team India Full Squad T20 WC)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.






















