एक्स्प्लोर
इंग्लंडला कोहलीचा ‘विराट’ इशारा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंडच्या भूमीवर पहिलंवहिलं कसोटी शतक झळकावून, एजबॅस्टन कसोटीत भारताच्या आव्हानात नवी जान भरली. विराटच्या या शतकानं टीम इंडियाला पहिल्या डावात सर्व बाद २७४ धावांची मजल मारून दिली. त्यामुळं इंग्लंडला पहिल्या डावात अवघी तेरा धावांची आघाडी मिळाली.

लंडन : अखेर विराट कोहलीनं एजबॅस्टन कसोटीत शतक ठोकून इंग्लिश भूमीवरची अपयशाची मालिका खंडित केली. टीम इंडियाच्या कर्णधाराचं इंग्लंड दौऱ्यातलं हे पहिलं शतक इतकं मोठं होतं की, त्यानं इंग्लंडमधल्या पाच कसोटी सामन्यांमधला धावांचा बॅलन्सही खुजा ठरला. विराट कोहलीला 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांमध्ये मिळून केवळ 134 धावाच जमवता आल्या होत्या. उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूंना छेडण्याचा विराटचा कच्चा दुवा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी नेमका हेरला होता. त्यामुळं दहापैकी चार डावांत त्याला जेम्स अँडरसननं माघारी धाडलं. स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस जॉर्डननं विराटचा प्रत्येकी दोनवेळा काटा काढला. आणि एकदा लियाम प्लन्केटनं त्याची विकेट काढली होती. टीम इंडियाच्या कर्णधारानं एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्याच डावात 149 धावांची खेळी उभारून इंग्लिश गोलंदाजांना सलामीलाच इशारा दिला. विराटनं 225 चेंडूंमधल्या या खेळीला बावीस चौकार आणि एका षटकाराचा साज चढवला. त्याचं इंग्लिश भूमीवरचं हे पहिलं कसोटी शतक असलं तरी, आजवरच्या कारकीर्दीतलं ते बाविसावं कसोटी शतक ठरलं. विराटच्या या खेळीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं वारंवार गार्ड बदलून इंग्लिश गोलंदाजांना पेचात पकडलं. त्यानं शतकाआधी मोठा फटका खेळण्यासाठी खराब चेंडूची प्रतीक्षा केली. त्यामुळं विराटचं शतक साजरं झालं त्या वेळी तब्बल 40 चेंडूंवर त्याच्या नावावर एकही धाव नव्हती. त्यापैकी 26 चेंडू हे विराटचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या जेम्स अँडरसनचे होते. जगातला एक सर्वोत्तम स्ट्रोकप्लेयर असा विराटचा लौकिक आहे. आपल्या त्याच वैशिष्ट्याला मुरड घालून खेळण्याची चिकाटी भारतीय कर्णधारानं एजबॅस्टनवर दाखवली. त्यामुळंच समोरच्या एंडनं खंबीर साथ न लाभूनही एकट्या विराट कोहलीनं टीम इंडियाला इंग्लंडच्या धावसंख्येच्या वेशीवर नेऊन ठेवलं. विराट कोहलीनं एजबॅस्टन कसोटीत उभारलेली खेळी टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला कलाटणी देणारी ठरू शकते. भारतीय कर्णधारानं २०१४ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या अॅडलेड कसोटीत झळकावलेलं शतक ही त्याची आजवरची सर्वोत्तम खेळी मानली जाते. त्या कसोटीत 364 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटनं पाचव्या दिवशी शतक साजरं केलं होतं. पण भारताला चुटपूट लावणारा पराभव स्वीकारावा लागला होता. विराटच्या मते, एजबॅस्टनवरचं शतक ही त्याची दुसरी सर्वोत्तम खेळी ठरावी. पण या शतकानं एजबॅस्टन कसोटी टीम इंडियाच्या बाजूनं झुकवली, तर विराट कोहलीलाही आपलं मत बदलावं लागेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
राजकारण























