WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
WTC Points Table Update after IND vs SL 1st Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवत आपल्या मोहिमेला सुरुवात केली.

WTC Points Table update after IND vs SL 1st Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवत आपल्या मोहिमेला सुरुवात केली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने सामन्यात सुरुवातीपासूनच आपली पकड कायम ठेवली. काही टप्प्यांवर श्रीलंकेने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र निर्णायक क्षणी भारतीय गोलंदाजांनी पुन्हा जोरदार कमबॅक करत सामना आपल्या बाजूने खेचून आणला. या विजयाचा थेट फायदा भारताच्या डब्ल्यूटीसी गुणतालिकेतील पीसीटीला झाला आहे. भारताचा पीसीटी 48.15 वरून थेट 53.33 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या विजय मिळूनही डब्ल्यूटीसी क्रमवारीत भारताच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. भारत अजूनही पाचव्या स्थानावरच आहे. यामागे बांगलादेशचा विजय हे प्रमुख कारण आहे.
भारताचे गुण 52 वरून 64 वर...
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर डब्ल्यूटीसीच्या या चक्रात भारताने आतापर्यंत एकूण 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयापूर्वी भारताच्या खात्यात 52 गुण होते. कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताला 12 गुण मिळाले आणि त्यामुळे संघाचे एकूण गुण 64 वर पोहोचले आहेत. या विजयामुळे भारताचा पीसीटी देखील मोठ्या प्रमाणात वाढला. सामन्यापूर्वी भारताचा पीसीटी 48.15 टक्के होता. आता तो वाढून 53.33 टक्के झाला आहे. म्हणजेच भारताच्या पीसीटीमध्ये तब्बल 5.18 टक्क्यांची वाढ झाली आहे.
श्रीलंकेला मोठा धक्का, पीसीटी घसरला
दुसरीकडे, भारताकडून पराभव झाल्यामुळे श्रीलंकेच्या पीसीटीमध्ये मोठी घसरण झाली आहे. या डब्ल्यूटीसी चक्रात श्रीलंकेने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताविरुद्धच्या पराभवामुळे श्रीलंकेच्या गुणांमध्ये कोणतीही भर पडलेली नाही. संघाच्या खात्यात यापूर्वी असलेले 20 गुण कायम आहेत. मात्र, सामन्याच्या निकालामुळे पीसीटीवर मोठा परिणाम झाला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा पीसीटी 41.67 टक्के होता. आता तो घसरून 33.33 टक्क्यांवर आला आहे. तरीदेखील श्रीलंकेला क्रमवारीत फार मोठा धक्का बसलेला नाही. संघ अजूनही सहाव्या स्थानावर कायम आहे.
विजय मिळूनही भारत पाचव्या स्थानावरच का?
हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताने सामना जिंकला, 12 गुण मिळवले आणि पीसीटीमध्येही मोठी वाढ झाली. मग क्रमवारीत भारताला वरचे स्थान का मिळाले नाही? याचे कारण बांगलादेश आहे. बांगलादेशने नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला. या विजयामुळे बांगलादेशचा पीसीटी वाढून 66.67 टक्के झाला आहे. भारताचा पीसीटी सध्या 53.33 टक्के आहे. त्यामुळे बांगलादेशचा पीसीटी भारतापेक्षा अधिक असल्याने भारताला पाचव्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे.
श्रीलंकेची घसरण
श्रीलंकेच्या पीसीटीमध्ये 41.67 वरून 33.33 टक्क्यांपर्यंत घसरण झाली असली, तरी त्यांचे सहावे स्थान कायम आहे. यामागे इंग्लंडचा कमी पीसीटी कारणीभूत आहे. इंग्लंडचा पीसीटी सध्या 24.36 टक्के आहे. त्यामुळे श्रीलंकेचा पीसीटी घसरूनही तो इंग्लंडपेक्षा अधिक आहे. त्यामुळे श्रीलंका सहाव्या स्थानावर कायम आहे आणि इंग्लंड त्याच्या मागे आहे.
हे ही वाचा -




















