IPL 2026 Points Table : आरसीबीला पराभवाचा मोठा धक्का, पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ! मुंबई इंडियन्सचे चान्सेस वाढले? जाणून घ्या गणित
IPL 2026 Points Table After LSG beat RCB : प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास कमी आल्या असल्या तरी आयपीएल 2026 मध्ये तळाच्या स्थानावर असलेल्या संघांनी इतर संघांची गणितं बिघडवायला सुरुवात केली आहे.

IPL 2026 Points Table After LSG beat RCB : प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास कमी आल्या असल्या तरी आयपीएल 2026 मध्ये तळाच्या स्थानावर असलेल्या संघांनी इतर संघांची गणितं बिघडवायला सुरुवात केली आहे. सध्या हे काम लखनऊ सुपर जायंट्सने केलं आहे. सलग 6 सामन्यांतील पराभवानंतर अखेर लखनऊला मोठा विजय मिळाला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनऊने आपल्या दहाव्या सामन्यात विद्यमान विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचा 9 धावांनी (DLS नियमांनुसार) पराभव केला. या विजयामुळे गुणतालिकेत लखनऊच्या स्थानात फारसा बदल झाला नसला तरी प्लेऑफच्या उरलेल्या आशा मात्र अजूनही जिवंत राहिल्या आहेत.
7 मे रोजी लखनऊ येथील एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, पावसामुळे दोन-तीन वेळा खेळात व्यत्यय आला, ज्यामुळे सामना थांबवावा लागला. असे असूनही, संपूर्ण सामन्यातून केवळ 2 षटके कमी करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना, मिचेल मार्शच्या अविस्मरणीय शतकाच्या जोरावर लखनऊने 209 धावा केल्या. यानंतर, डकवर्थ-लुईस प्रणालीनुसार आरसीबीला 213 धावांचे लक्ष्य देण्यात आले. प्रत्युत्तरात, प्रिन्स यादवच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनऊने बंगळूरूला 203 धावांवर रोखले.
आरसीबीला पराभवाचा मोठा धक्का
या विजयामुळे लखनऊने दोन गुण मिळवले असून, 10 सामन्यांतील त्यांचे एकूण गुण सहा झाले आहेत, ज्यामुळे त्यांनी या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे. पण, नेट रन रेटमध्ये मुंबईच्या मागे असल्यामुळे लखनऊचे स्थान कायम आहे आणि पंतचा संघ 10 व्या स्थानावर आहे. दरम्यान, बंगळूरूला या हंगामात प्रथमच सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे, ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवता आले नाही. 10 सामन्यांतून 12 गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. उर्वरित संघांची स्थिती खालील तक्त्यात पाहता येईल.
मुंबई इंडियन्सचे चान्सेस वाढले का?
मुंबई इंडियन्स सध्या 10 सामन्यांत केवळ 3 विजय मिळवून 6 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. तांत्रिकदृष्ट्या मुंबई अजूनही स्पर्धेत टिकून आहे, पण त्यांच्यासाठी पुढचा प्रवास हा करो या मरो आहे. मुंबईला त्यांचे उर्वरित 4 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, जेणेकरून ते 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतील. मुंबईला केवळ स्वतःच्या विजयावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यांना प्रार्थना करावी लागेल की आरसीबी, आरआर आणि जीटी यांसारख्या 10-12 गुण असलेल्या संघांनी त्यांचे पुढचे बहुतेक सामने गमवावेत. अजून एक मुंबईचा रन रेट सध्या (-0.649) आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी त्यांना हा रेट पॉझिटिव्हमध्ये आणणे अत्यंत गरजेचे आहे.
आता प्रश्न असा आहे की, शुक्रवार, 8 मे रोजी होणाऱ्या सामन्याचा गुणतालिकेवर काय परिणाम होऊ शकतो. आज, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नवी दिल्लीत सामना होणार आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. दिल्ली 8 गुणांसह 7 व्या स्थानावर आहे, तर कोलकाता 7 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. जर दिल्लीने आजचा सामना जिंकला, तर त्यांचे 10 गुण होतील, पण ते 7 व्या स्थानावरच राहतील, कारण त्यांचा रनरेट चेन्नईपेक्षा खूपच खराब आहे. मात्र, जर कोलकाताने हा सामना जिंकला, तर त्यांचे 9 गुण होतील आणि ते दिल्लीला मागे टाकून 7 व्या स्थानावर पोहोचतील.
हे ही वाचा -




















