Ind vs Ban: भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. कसोटीतील सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. भारतीय संघाने सर्वांत वेगवान 50, 100 आणि 200 धावांचा विक्रम नोंदविला. फिरकीपटूंना खेळपट्टीची जी साथ लाभली ती बघता भारतीय संघ अखेरच्या दिवशी विजय मिळवू शकतो ही शक्यता बळावली.


रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल या महत्वाच्या फलंदाजांनी मैदानात उतरताच आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याच्या या फलंदाजीचं कौतुक होत असताना वेगवान गोलंदाज आकाश दीपच्या खेळीची चर्चा देखील सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.  आकाश दीपने मैदानात उतरताच पहिल्या दोन चेंडूत गगनचुंबी षटकार टोलावले. आकाश दीपने 5 चेंडूत 12 धावा केल्या. 


विराट कोहलीने दिली होती बॅट-


दुसऱ्या कसोटी सामन्याआधी आकाश दीपने विराट कोहलीकडे एक बॅटची मागणी केली होती. त्यानंतर कोहलीने त्याला त्याची बॅट भेट दिली. हीच बॅट घेऊन आकाश दीप फलंदाजीसाठी उतरला आणि मैदानात षटकार टोलावले. आकाश दीपचे षटकार पाहून कोहलीही अवाक झाला. यादरम्यानचा फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 






सामना कसा राहिला?


 बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (India vs Bangladesh, 2nd Test) भारताने आपला पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव भारताने 233 धावांत गुंडाळला होता. भारताला पहिल्या डावात 52 धावांची आघाडी मिळाली. पावसाने व्यत्यय आणलेल्या कानपूर कसोटीचा आज चौथा दिवस होता. भारताने कानपूर कसोटी अनिर्णित राहण्याची चिन्हे असताना विजयाकडे वळवली आहे. दरम्यान, भारताने आज बांगलादेशचा डाव गुंडाळल्यानंतर आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालने (Yashashwi Jaiswal) पहिल्या 3 षटकातच 51 धावा केल्या. रोहित आणि यशस्वीने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे केवळ 12 षटकांत भारतीय संघाने  1 बाद 121 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 51 चेंडूत धडाकेबाज 72 धावा ठोकल्या. तर कर्णधार रोहित शर्मा 11 चेंडूत 23 धावा करुन माघारी परतला. 


संबंधित बातमी:


रोहित, यशस्वीकडून षटकार-चौकारांचा पाऊस; बांगलादेशचा कर्णधार चेंडू घेऊन थेट अम्पायरकडे धावला, Video