T20 World Cup : भारत ते संयुक्त अरब अमिरात, टी 20 वर्ल्ड कपसाठी 20 संघ निश्चित, संपूर्ण यादी एका क्लिकवर
T20 World Cup : आगामी टी 20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्याकडून आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी 20 संघ ठरले आहेत.

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनात 2026 चा टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्याकडून केलं जाईल. 2026 मध्ये हा वर्ल्ड कप फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी 20 संघ निश्चित करण्यात आले आहेत. भारतानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं होतं. आगामी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात मैदानात उतरेल.
वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेले 20 संघ
भारत आणि श्रीलंका यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी 20 संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, आयरलँड, न्यूझीलँड, पाकिस्तान, कॅनडा, इटली, नेदरलँडस, नामिबिया, झिम्बॉब्वे, नेपाळ, ओमान आणि संयुक्त अरब अमिरात
भारत प्रबळ दावेदार
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारतानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप जिंकला आहे. टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंकेत होत असल्यानं ते भारतासाठी फायदेशीर ठरु शकतं. सूर्युकमार यादवच्या नेतृ्त्त्वातील भारतीय संघाची कामगिरी पाहता ते टी 20 वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या खेळाडूंनी आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तोंदलन टाळलं होतं. भारत सरकारच्या भूमिकेनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्वीपक्षीय सामने होत नाहीत. आयसीसीच्या स्पर्धा आणि आशिया कप या सारख्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने आले तर ते खेळू शकतात. मात्र, हे सामने त्रयस्थ ठिकाणी आयोजित केले जावेत अशी भारताची भूमिका आहे. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्याऐवजी भारताचे सामने यूएएईत आयोजित करण्यात आले होते. आता आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे सामने श्रीलंकेतील कोलंबोत होतील, अशी शक्यता आहे. भारत पाकिस्तान एकाच गटात आल्यास दोन्ही संघांचा सामना श्रीलंकेत होईल.पाकिस्तानचा संघ अंतिम सामन्यात पोहोचल्यास टी 20 वर्ल्ड कपचा सामना श्रीलंकेत होणार आहे.



















