Ind Vs Pak Rinku Singh: भारत-पाक मॅचमधील 'तो' क्षण विधिलिखीत, रिंकू सिंहने 6 सप्टेंबरला कार्डवर काय लिहलं होतं अन् तसंच घडलं
Ind Vs Pak Asia Cup 2025 Rinku Singh: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. संपूर्ण स्पर्धेत न खेळलेल्या रिंकू सिंहने विजयी धाव काढली.

Ind Vs Pak Asia Cup 2025 Rinku Singh: आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा (Ind Vs Pak) पाच गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने तिलक वर्मा (Tilak Verma) याच्या नाबाद 69 धावांच्या जोरावर अखेरच्या षटकात हे आव्हान पार करत नवव्यांदा आशिया कपवर नाव कोरले. संपूर्ण आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2025) बेंचवर बसून असलेला रिंकू सिंह (Rinku Singh) याने या सामन्यात विजयी चौकार लगावला. हार्दिक पांड्या जायबंदी असल्यामुळे रिंकू सिंह याला अंतिम सामन्यात संधी देण्यात आली होती. रिंकू सिंह याला संपूर्ण स्पर्धेत एकदाही सामना खेळण्याची संधी न मिळाली नव्हती. तो केवळ बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात यायचा. मात्र, एखादी गोष्ट विधिलिखित असल्याप्रमाणे कालच्या सामन्यात रिंकू सिंह शेवटच्या षटकात मैदानात फलंदाजीसाठी आला आणि त्याने विजयी चौकार लगावला.
भारतीय संघ संकटात सापडला असताना तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकी भागीदारी करुन संघाला संकटातून बाहेर काढले. शेवटच्या षटकांमध्ये या दोघांनी आवश्यक धावगती गाठण्यासाठी फटकेबाजी सुरु केली. त्यावेळी सीमारेषेवर शाहीन आफ्रिदी याने अलगद शिवम दुबे याचा झेल टिपला. 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शिवम दुबे बाद झाला. त्यावेळी भारतीय संघाला 10 धावांची गरज होती. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर दोन, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर एक धाव काढून तिलक वर्मा याने रिंकू सिंह याला स्ट्राईक दिली. त्यावेळी रिंकू सिंह याने हारिस रौफचा चेंडू मिड ऑनवरुन सीमापार टोलावत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. रिंकू सिंह याने एका चेंडूत 4 धावा काढल्याने त्याचा स्ट्राईक रेट 400 चा होता.
Rinku Singh: रिंकू सिंहची 'ती' इच्छा खरी झाली
आशिया चषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय संघातील सर्व खेळाडूंना एक कार्ड देण्यात आले होते. या कार्डवर खेळाडुंना अंतिम सामन्याबाबतची त्यांची इच्छा लिहण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी रिंकू सिंह याने त्या कार्डवर 'विजयी धाव' काढायची असल्याचे लिहले होते. मात्र, त्यानंतर रिंकू सिंह याला आशिया कप मालिकेत एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तो राखीव खेळाडू म्हणून बेंचवर बसून होता. अधुनमधून बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात यायचा. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी हार्दिक पांड्या जायबंदी झाला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या फायलनमध्ये रिंकू सिंह याला प्लेईंग-11 मध्ये संधी देण्यात आली. मात्र, सामन्यातदेखील रिंकूला फलंदाजी मिळण्याची शक्यता कमी होती. परंतु, अखेरच्या षटकापूर्वी शिवम दुबे बाद झाला आणि रिंकू सिंह मैदानात आला. त्यानंतर तो स्ट्राईकवर आला तेव्हा भारताला जिंकण्यासाठी अवघी एक धाव हवी होती. तेव्हा रिंकू सिंहने विजयी चौकार मारत स्पर्धेपूर्वी कार्डवर लिहलेले आपले शब्द खरे करुन दाखवले.
Rinku singh out of nowhere , hitting the winning runs. God’s plan
— Bihar_se_hai (@Bihar_se_hai) September 28, 2025
pic.twitter.com/FTyJ4fnoQ7
आणखी वाचा



















