Thane News : साकेत उड्डाणपुलाचे काम चार ते पाच दिवसांतच पूर्ण, पण जड वाहनांना वाहतुकीच्या वेळा निश्चित
Thane News : साकेत उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले मुंबई नाशिक महामार्गावरुन येणाऱ्या जड आणि अवजड वाहनांना शहरात जाण्यासाठी तसेच बाहेर पडण्यासाठी वेळा निश्चित करुन देण्यात आल्या आहेत.

ठाणे : ठाण्यातील साकेत उड्डाणपुलाचे (Saket Bridge) काम पूर्ण झाले असून हा पूल वाहतुकीसाठी (Transportation) खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आता हा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी देखील खुला करण्यात आला आहे. परंतु या वाहनांना शहरात येण्यासाठी आणि शहरातून बाहेर पडण्यासाठी वेळा निश्चित करुन देण्यात आला आहेत.
जर ही वाहने निश्चित वेळेशिवाय शहरात आढळली तर संबंधित वाहनांवर आणि चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेतच वाहतूक करण्याचे आवाहन ठाणे वाहतूक विभागाकडून ट्रान्सपोर्ट आणि चालकांना करण्यात आले आहे.
वाहतुकीच्या वेळा कोणत्या?
ठाणे वाहतुकीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच निर्देश देखील वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. जड आणि अवजड वाहनांसाठी रात्री 11 ते सकाळी 4 या वेळेत वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच दुपारी 12 ते 4 या वेळेत देखील या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु या वेळेशिवाय इतर कोणत्याही वेळेत जर ही वाहने वाहतूक करताना आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी प्रशासनाकडून या उपाययोजना करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच जर कोणताही गाडी वाटेत बंद पडली तर कोणत्याही प्रकारचा टोल न आकारता सरसकट गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात टोल प्रशासनाला देण्यात आले आहेत. ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांनी सांगितले आहे.
'या' मार्गाने करता येणार जड वाहनांना वाहतूक
या उड्डाणपुलाचे बेअरिंग निखळल्याने पूल धोकादायक अवस्थेमध्ये होता. त्यामुळे या पुलावरुन वाहतूक करणे देखील अत्यंत धोकादायक होते. तसेच अभियंत्याची टीम आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करुन या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु होते. त्यामुळे अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
जड आणि अवजड वाहनांना माजिवाडा येथे सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे. तसेच यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या वाहनांना घोडबंदर रोडवरुन माजिवाडा जंक्शन येथून आनंदनगर चेक नाका, ऐरोली रबाळे तुर्भेच्या दिशेने दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये प्रवास करु शकतील.
तर गुजरातकडून येणाऱ्या आणि नाशिकच्या दिशेने रवाना होणाऱ्या अवजड वाहनांसाठी माजिवाडा येथे 24 तास प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच मुंबईहून नाशिकडे जाणाऱ्या वाहनांना आनंदनगर टोलनाका येथे 24 तास प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गांना पर्यायी मार्ग म्हणून मुलुंड, ऐरोली मार्गे ऐरोली रबाळे, कोपरखैरणे महापे, शेळीपाटा, मुंब्रा बायपास, खारेगाव टोलनाका येथून नाशिकच्या दिशेने प्रवास करता येणार आहे.
हेही वाचा :
Health Department : राज्यात आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; 11 हजार पदांसाठी आज जाहिरात येणार
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















