Solapur News : आधी पाहावी पंढरी, मग पाहावी संतभूमी असा गौरव सोलापुरातल्या मंगळवेढ्याचा केला जातो. पंढरपूरपासून अवघ्या 21 किलोमीटर अंतर असणाऱ्या मंगळवेढ्यात कित्येक महान संत होऊन गेले. या सर्व संतांचा जन्म जरी मंगळवेढ्यात झाला नसला तरी कित्येक संतांची ही कर्मभूमी राहिली आहे. तर काही संतांच्या वास्तव्याने मंगळवेढ्याची ही भूमी पावन झाली आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यात आपल्या विचारांनी क्रांती करणाऱ्या संतांचा वास या मंगळवेढ्याला लाभल्याचे अभ्यासक सांगतात. मंगळवेढ्यात जेव्हा जेव्हा उत्खनन झालं आहे तेव्हा तेव्हा ऐतिहासिक साहित्य, शिल्प सापडतात. इथल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळील विहरीत दुर्मिळ अशी ब्रह्मदेवाची मुर्ती आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीसाठी येणारा प्रत्येक वारकरी आजही मंगळवेड्यात माथा टेकवायला येतो. 




“संतभूमी मंगळवेढा”  


ज्वारीचे कोठार अशी ओळख असलेला मंगळवेढा हा दुष्काळी तालुका आहे. या भूमीला प्रचंड असे पौराणिक, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे. संत चोखामेळा, संत दामाजी आणि संत कान्होपात्रा यांच्या अनेक संताच्या वास्तव्याने मंगळवेढा पावन झाले आहे. त्यामुळेच भीमा नदीच्या कुशीत वसलेल्या या तालुक्याला संत भूमी मंगळवेढा म्हणून ही ओळखलं जातं.


संपूर्ण देशात ज्वारीचे कोठार अशी ओळख मिरवणारा मंगळवेढा 


पंढरपुरच्या पांडूरंगापासून अवघ्या 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच मंगळवेढ्याला संताचे माहेरघर देखील म्हटलं जातं.


यातील सर्व संतांचा जन्म जरी मंगळवेढ्यात झाला नसला तरी या सर्व संतांचा मंगळवेढ्याशी काही ना काही संबंध असल्याचं अभ्यासक सांगतात. बीदर येथील महंमदशाहच्या दरबारात सैन्याचे सेनापती असलेले दामाजी पंत त्यांच्यातल्या हुशारकीमुळे मंगळवेढ्याच्या मामलेदार पदी नियुक्त झाले. प्रशासकीय अधिकारी असलेले दामाजी पंत हे अतिशय संवेदनशील होते. उभ्या आयुष्यात एकही अभंग न लिहीणारे दामाजी पंत हे त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे स्वत: जगदगुरू तुकाराम महाराजांच्या अभंगात आपल्याला सापडतात.




ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा अशा विलक्षण अभंगातून समाजप्रबोधन करणारे संत चोखामेळा हेसुध्दा याच मातीतून देवलोकी गेले. केवळ चोखामेळाच नव्हे तर चोखामेळांचं अवघं कुटूंब हे संतगतीला प्राप्त झालेलं होतं, पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेव्हणा बंका आणि मुलगा कर्ममेळा ही चोखामेळाची संतपरंपरा. चोखामेळांच्या समाधीची अवस्था आज जरी दयनीय असली तरी याच ठिकाणी त्यांच्या अस्थिंमधून विठ्ठल नामाचा घोष हा संत नामदेवांच्या कानी पडला आणि चोखामेळांना पंढरपूरी साक्षात विठ्ठलच्या समोर स्थान मिळाले हे आपल्याला चरित्रकार सांगतात.


दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंगळवेढ्यात अशा अनेक संतांनी आपल्या विचारांची बीजे रुजवली. केवळ महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटकला देखील याच संतांनी नवचैतन्य प्राप्त करून दिलं. बाराव्या शतकात आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणून ओळखले जाणाऱ्या  महात्मा बसवण्णांनी आपल्या आयुष्याची काही वर्षे मंगळवेढ्यात घालवली. 


महत्वाच्या बातम्या :