निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख
Vinay Natu Vs Bhaskar Jadhav: विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार विनय नातू यांच्यावर टीका करत डॉ. विनय नातू यांच्या साडी वाटपाच्या कार्यक्रमावर आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे.
गुहागर: विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गुहागरमध्ये राजकीय शिमगा होतानाचं चित्र दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून उल्लेख केला आहे. तर, भास्कर जाधवांच्या आरोपाला विनय नातू यांच्याकडून देखील चोख प्रतिउत्तर देण्यात आलं आहे.
निवडणुका जाहीर होण्याआधीच गुहागरमध्ये राजकीय फड रंगायला सुरवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार विनय नातू यांच्यावर टीका करत डॉ. विनय नातू यांच्या साडी वाटपाच्या कार्यक्रमावर आक्षेप घेत आया बहिणींना शिवीगाळ होत असताना फिदीफिदी हसणाऱ्या डॉ.विनय नातू यांच्याकडून साड्या घेऊ नयेत असे आवाहन करत निवडणुका जाहीर झाल्या की स्वतः ला सुसंस्कृत समजणाऱ्या विनय नातू यांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या समोर आणेन असंही म्हणाले आहेत.
तर भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देताना विनय नातू यांनी सिंधुदुर्गमध्ये जाऊन भर सभेत राणे यांच्यावर केलेल्या टीकेचा दाखल देत मला विकृत म्हणणारे भास्कर जाधव शारदा देवीच्या मंदिरात ज्या पद्धतीने शिवीगाळ करत होते तो विकृतपणा विसरले का असा सवाल देखील विनय नातू यांनी उपस्थित केला आहे.
पंधरा वर्षे आमदार राहून मतदारसंघासाठी काय केलं? विनय नातूंचा सवाल
दोन दिवसांपुर्वी विनय नातूंनी भास्कर जाधवांना पंधरा वर्षे आमदार असून मतदारसंघासाठी काय केलं म्हणत डिवचलं होतं. कोटींचा विकास केला करोडोंचा विकास केला असे सांगणारे साधा धरणातील पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. तळवटपाल धरणातलं पाणी कालव्याचा प्रश्न वर्षभरात मार्गी लावू असं सांगितलं होतं. मग ते पंधरा वर्षात तो प्रश्न का सुटला नाही? गेले पंधरा वर्षे तुम्ही या मतदारसंघात आमदार आहात. मग गेले पंधरा वर्षे काय करत होतात असा प्रश्न माजी आमदार विनय नातू यांनी विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना केला आहे.
स्वार्थासाठी भास्कर जाधव शिवसेनेत
2014 ला कमळ आणि बाण वेगवेगळा होता. त्यामुळे घड्याळ निवडून आलं. मात्र 2019 मध्ये ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. शरद पवारांनी राष्ट्रवादीत त्यांना विविध पदे दिली. पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद देखील दिलं. पण केवळ स्वार्थासाठी यांनी 2019 ला धनुष्य हाती घेतलं. केवळ आपल्या स्वार्थासाठी घड्याळ सोडलं. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली ते निवडून आले. हा मतदारसंघ केवळ आपल्या फायद्यासाठी वापरुन स्वतः चा विकास करुन घेतला. मतदारसंघातील मतदार मात्र आजही उपेक्षित आहे, असा हल्लाबोल नातू यांनी भास्कर जाधवांवर केला होता.