Sangli Crime : मिरजेतील 'त्या' वादग्रस्त जागा प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची सुनावणी आता 19 जानेवारी रोजी होणार आहे. तहसीलदारांनी पुन्हा त्या जागेच्या ठिकाणी "जैसे थे" आदेश दिले आहेत. जागेबाबत पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटाकडून अजून मुदत मागितली. तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी दोन्ही पार्टीचे म्हणणं ऐकून 19 तारखेपर्यंत पुढील मुदत दिली. याआधी सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी मिरज तहसीलदाराकडे गाळेधारकांच्या वकिलांनी योग्य कागदपत्रे आणि म्हणणे सादर करण्यासाठी तहसीलदाराकडे मुदत मागितली होती.


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी रात्रीत जेसीबी घालून केलेल्या पाडापाडीनंतर वाद पेटला आहे. ब्रह्मानंद पडळकर यांनी रात्रीत जेसीबीने दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर मूळ जागा मालक असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती पुढे आली आहे. ज्या जागेवरील अतिक्रमण पाडले गेले त्या जागेचा आपण मूळ मालक असून जमिनीच्या मालकी हकाबाबत उच्च न्यायालयात केस सुरू आहे, असा दावा करणारी विष्णू लामदाडे ही व्यक्ती 2 दिवसाच्या राड्यानंतर समोर आली होती. 


पडळकर यांनी बेकायदेशीर जमीन खरेदी केली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, पडळकर यांनी (Brahmanand Padalkar) बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप विष्णू लामदाडे यांनी केला. आपल्यात आणि चड्डा यांच्यात या जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयात केस सुरू असल्याचा दावा लामदाडे यांनी केला. दरम्यान, विष्णू लामदाडे यांनी या जमिनीवर मालकी सांगणाऱ्या सगळ्यांवर गुन्हा दखल करा अशीही मागणी केली आहे. 


कोणत्या राजकीय नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे घडले?


दुसरीकडे, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस जिल्हापोलिस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी पाच सहा जेसीबीच्या सहाय्याने चारशे-पाचशे गुंड आणून मिरज शहरात दहशत निर्माण केली. स्वतःला वंचितांचे कैवारी समजणाऱ्या लोकांनीच वंचितांची व गरिबांची दुकाने व घरे उद्ध्वस्त केल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलिस अधिकारी यांनी हे सर्व घडू कसे दिले? पोलिसांची गस्त त्या दिवशी नव्हती का? कोणत्या राजकीय नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे घडले याचा तपास करून सोक्षमोक्ष लागला पाहिजे, अतिक्रमण काढण्याचा कायद्याने अधिकार कोणाचा? उद्या एखादी घटना घडली तर प्रशासन स्वतः कारवाई करणार की ज्याचा त्याला रस्त्यावर न्याय निवाडा करायला सांगणार? अशी विचारणा केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या