Sambhaji Raje Bhosale:  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मी उपोषण केलं होतं. ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ते फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत तर ज्यांनी उपोषण सोडताना आश्वासन दिलं ते एकनाथ शिंदें मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री यांना सगळं माहिती आहे. ते मराठा समाजाचे आहेत. आरक्षणासाठी आपल्याला परत लढायला लागेल पुन्हा लढा उभारावा लागेल, असं वक्तव्य माजी खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे. दीपक केसरकर आणि संभाजीराजे छत्रपती यांची आज पुण्यात भेट झाली त्यावेळी ते बोलत होते. नवनिर्वाचित मंत्री दीपक केसरकर यांना पर्यटन खातं मिळावं अशी इच्छा आहे. रायगडासोबतच महाराष्ट्र पर्यटन देशभरात  पोहचण्याची गरज आहे. त्यांच्या मार्फत महाराष्ट्र देशभरात पोहचेन अशी अपेक्षा संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेमराठा समाजाला मूलभूत सुविधा द्याव्यात. मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवण्यासाठी आयोगाची नेमणूक करण्यात यावी. त्यासाठी तातडीने बैठक बोलवावी आणि समाजाचे प्रश्न सोडवावे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही आमंत्रित करण्यात यावे. मराठा आरक्षणाची सगळी प्रोसेस परत करावी लागणार आहे. मागासवर्गीय आयोग स्थापन करावे लागणार आहेत, असंही ते म्हणाले. 

शिवसेनेने शब्द पाळला नाही.

शिवसेनेने खासदारकी दिली नाही. हा माझ्यासाठी इतिहास झाला आहे. शिवसेनेने शब्द पाळला नाही. माझी त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे. मात्र आता स्वराज्यच्या माध्यामातून अनेक सामाजिक कामं हाती घेतले आहेत. विस्तापित, गरजू, गरीबांना ताकद देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्वराज्यच्या माध्यमातून राजकीय पक्ष काढणं सोपं नाही. त्यासाठी अनेक गोष्टी लागतात. त्या सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र प्रश्न सुटले नाहीत तर नक्कीच पक्ष काढायचा विचार करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

उदयन राजे यांची देखील भेटप्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा उदयनराजे भोसले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवसेना माझी आहे, असं मी म्हणू का? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. दीपक केसरकर यांनी आज पुण्यात संभाजी राजे भोसले आणि उदयन राजे भोसले यांची भेट घेतली.