Pune Navale Bridge Accident : वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नवले पुलाच्या सुरक्षेबाबत प्रश्न
Pune Navale Bridge Accident : नवले पुलावर या आधीही अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून त्याच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नवले पुलाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
अपघातात काही क्षणांतच 8 जण जळून खाक झाले
बंगळुरू पुणे महामार्गावर नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने शहर हादरलं. ही संध्याकाळ आठ निष्पाप जीवांसाठी 'काळ' ठरली. घटनास्थळी पसरलेला काळोख, वाहनांचे चेंदामेंदा झालेले अवशेष आणि जखमींच्या नातेवाइकांचा हंबरडा हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणांतच ८ जण जळून खाक झाले, तर तब्बल २० जण जखमी झाले. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या ८ जणांमध्ये एक ३ वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले. त्यातच कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने समोर असलेल्या १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली. दरम्यान, प्रामुख्याने कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी झाला. त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. धडकेनंतर कंटेनरच्या डिड्रोल टँकला आग लागली आणि काही क्षणांतच आगीचे लोट आकाशात झेपावले. सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली, कार पुढे उभ्या दुसऱ्या कंटेनरमध्ये कार अडकली आणि तिने पेट घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
























