नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्याने भांडण, बायकोची विषारी रसायन पिऊन आत्महत्या
नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्याने नवरा बायकोत तब्बल तीन दिवस वाद सुरू होता. अखेर बायकोने या वादानंतर विषारी रसायन पिऊन करून आत्महत्या केली.

पुणे : नवरा-बायको म्हटलं की थोडाफार रुसवा-फुगवा, वाद-विवाद अनेकांमध्ये होत असतात. मात्र, हा वाद विकोपाला गेला तर काय होऊ शकते? याची प्रचिती पुण्यात आली आहे. पुण्यात नवऱ्याने न विचारता पाणीपुरी आणल्याने नवरा बायकोत तब्बल तीन दिवस वाद सुरू होता. अखेर बायकोने या वादानंतर विषारी रसायन पिऊन आत्महत्या केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे (वय 33) याला पोलीसांनी अटक केली आहे.
गहिनाथ आणि प्रतीक्षा यांचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला असून दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांना एक मुलगा आहे. तर त्या दोघांमध्ये मागील दोन वर्षाच्या कालावधीत किरकोळ कारणामुळे वाद होत होते. असाच किरकोळ वाद मागील आठवड्यात दोघांमध्ये झाला. गहिनाथ कामावरून येताना पाणीपुरीचे पार्सल घेऊन आला. मला न विचारता पाणीपुरी का आणली? यावरून प्रतीक्षा यांनी गहिनाथ यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढील दोन दिवस गहिनाथ कामावर जाताना डब्बा घेऊन जात नव्हते.
या दोघांमध्ये त्या दोन दिवसात देखील किरकोळ वाद सुरूच होते. यातून प्रतीक्षा यांनी शनिवारी विषारी रसायन पिले, त्यानंतर त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रतीक्षा यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या प्रकरणी पती गहिनाथ सरवदे याला अटक केली असून या घटनेचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report





















