मुंबई : राज्यात पॅकिंग दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आलीय. 16 डिसेंबरपासून प्रति लिटर दोन रुपये दरवाढ लागू होणार आहे. गाईच्या पॅकिंग दुधात ही दरवाढ करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कल्याणकारी दुध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कात्रज दूध संघात ही बैठक पार पडली. या बैठकीला साठ वेगवेगळ्या सहकारी आणि खासगी दूध संघाचे दीडशे पदाधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत सध्या असलेल्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचं निर्णय घेतलाय. दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने दूध दरवाढीचा निर्णय घेतल्याचं संघाच्या वतीनं सांगण्यात आलं. शेतकऱ्यांचा खरेदी दर 29 रुपये तर एफआरपी मध्ये दोन रुपये वाढ करण्याचा ठराव केलाय. राज्यामध्ये अंतर्गत वापरासाठी 85 लाख लिटर दूध पॅकिंग मध्ये विकलं जातं. या ग्राहकांना मात्र या दूध दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. या बैठकीला राजाराम पाटील दूध संघ, बारामती, सोनाई, चितळे, पराग, नगरसह इतर जिल्ह्यातील दूध व्यवसायिकांनी हजेरी लावली होती.

राज्यातील दुध संकलन घटले -
राज्यात सरासरी पावणेदोन कोटी लिटर दुधाची गरज असताना सध्या दररोज 30 लाख लिटरने त्यात घट झाली आहे. पावसाळ्यानंतर दुधासाठी अनुकूल हंगाम सुरु होतो. मात्र, राज्यात ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने पशुधनाची मोठी हानी झाली. सोबतच मोठ्या प्रमाणात पिकांचेही नुकसाने झाल्याने चाऱ्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी राज्यातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यानंतर बाजारात दुधाचे उत्पन्न वाढल्याने बाजारात मुबलक प्रमाणात दुध येते. पण सध्या राज्यातील दूध संकलन मोठ्या प्रमाणात घटले आहे. महापुराचा सर्वात जास्त फटका पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याला बसला. परिणामी या भागातील दूध उत्पादनात अधिक घट झाल्याचे दिसून येते. त्याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद या भागातही हीच परिस्थिती आहे.

संबंधित बातम्या -

आधी ठरावावरुन राडा, नंतर फराळावरुन गोंधळ; गोकुळच्या सभेत गदारोळाची परंपरा कायम

गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा; सत्ताधाऱ्यांवर खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ

गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय रद्द

दूध दरवाढी संदर्भात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची प्रतिक्रिया | मुंबई | एबीपी माझा