पुणे :  'मला अजित दादांना (Ajit Pawar) राज्याच्या मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) पदी बसलेलं बघायचंय, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे', असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत कोल्हे यांनी हे वक्तव्य केलं. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आल्याचं कोल्हे म्हणाले. तसेच देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचं असेल तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे, असं आवाहन ही कोल्हे यांनी केलं. 



अमोल कोल्हे म्हणाले की, माझ्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं, माझ्यासाठी पायाला भिंगरी लावून पळालात. आता मला तुमच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. शरद पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतंय ही भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचं असेल तर त्या माझ्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये, असं ते म्हणाले. हीच गोष्ट राज्यपातळीवर अजित पवारांच्या बाबतीत आहे. 



शिरुरच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवारांच्या सोबत होतो. ते त्या इमारतीचा कोपरा ना कोपरा पाहत होते. मी त्यांना न्याहाळत होतो. त्यावेळी मनात विचार आला की, याच पद्धतीनं अजित दादांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्रे हातात असताना इथली प्रत्येक गोष्ट न्याहाळली असेल. पुन्हा हा योग पिंपरी चिंचवड शहरात कधी येणार? पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय, ही माझी भावना आहे, असं ते म्हणाले. 



ते पुढे म्हणाले की. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडसाठी अनेक गोष्टी दिल्या आहेत. ऋणातून उतराई होण्याची वेळ असते. अजित पवारांच्या कुशल नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. आता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे. त्या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.