![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune News : पुणे शहरातील 2000 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता, मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल- देवेंद्र फडणवीस
पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा 2 हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केली आहे
![Pune News : पुणे शहरातील 2000 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता, मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल- देवेंद्र फडणवीस Approval of two thousand crore rupees development works in Pune city says devendra fadanvis Pune News : पुणे शहरातील 2000 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता, मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल- देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/a3cbb01ac653345e3c3f7e9fab6c334e1673699854012442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune News : पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा 2 हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पुढील तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा हिस्सा देण्यात येईल आणि यावर्षापासून काम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
प्रगतीशील पुणे तयार करण्याचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे, ते म्हणाले, राज्य शासनाचे 60 टक्के आणि 40 टक्के महानगरपालिकेने खर्च करण्याच्या योजनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या कामांमुळे पावसाळ्यात शहरात नाल्यालगतच्या भागातील पूर परिस्थितीचा आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
शहराबाहेरील रिंगरोडचे कामही वेगाने हाती घेण्यात येत आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाला 10 हजार कोटी रुपये लागणार असूनही या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्या माध्यमातून पुण्याच्या आर्थिक विकासाला मदत मिळेल. हा रिंगरोड अडीच लाख कोटी रुपयांची व्हॅल्यु तयार करेल. पुढील 10 वर्षाची विकासाला दिशा देण्याचे कार्य हा मार्ग करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल
गेल्या पाच वर्षात महानगरपालिकेने विकासाची बरीच कामे केली. पुण्याचा विकास आराखडा या काळात मंजूर करून पुण्याचा विकासाचा मार्ग मोकळा केला. पुण्याच्या मेट्रोला गती देण्यात आली असून त्याचा एक टप्पा पूर्ण झाला. पुण्यात निर्माण होणाऱ्या मेट्रोच्या जाळ्यामुळे वाहतूकीची कोंडी कमी करण्याचे काम येत्या काळात होणार आहे. शिवाजीनगरच्या पुढे हिंजवडीपर्यंत मेट्रो न्यायची आहे. त्या संदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव आले आहेत. मेट्रो मार्गाचे इंटिग्रेशन झाल्यावर त्यास मान्यता दिली जाईल. पुण्यात पीएमपीएमएलच्या माध्यमातून चांगली बससेवा देण्यात येत आहे. देशात सीएनजी आणि इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या सर्वाधिक बसेस पुण्यात आहेत. शहरात एसी बसेस सुरू करताना तिकीटाचे दरही वाढविण्यात आले नाही. पुण्याचे चित्र बदलण्याचे काम या विविध माध्यमातून होत आहे. पुण्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. पुण्यात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर देशातील इतर शहरांप्रमाणे चांगले वातावरण पुण्यात निर्माण करून माहिती तंत्राज्ञान, मॅन्युफॅक्चरींग आणि नाविन्यतेच्या क्षेत्रात चांगली प्रगती करता येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)