Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील रहदारीच्या आणि प्रसिद्ध अशा नवले ब्रीजवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती.

पुणे : शहरातील (Pune) नवले पुलावर झालेल्या अपघातात (Accident) मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून व्हिडिओ पाहिल्यानंतर अपघाताची दाहकता लक्षात येते. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढल्याचं अग्निशमन दलाने सांगितलं आहे. मात्र, आणखी काहीजण आग लागलेल्या वाहनांमध्ये अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, मृतांचा आकडा वाढू शकतो. दरम्यान, घटनास्थळावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 जण जखमी असल्याची माहिती आहे.
पुण्यातील रहदारीच्या आणि प्रसिद्ध अशा नवले ब्रीजवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती. या आगीत एका ट्रकने पेट घेतला. अपघातानंतर कंटनेरच्या मध्ये कार अडकली असून क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढली जात आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती घटनास्थळावरुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते तर, अनेकजण जखमी आहेत. त्यामध्ये, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अपघात नेमका कसा घडला? (Pune navale bridge accident)
प्राथमिक माहितीनुसार, राजस्थान पासिंगचा लोडेड ट्रक साताऱ्याकडे मुंबईच्या दिशेने चालला होता. मात्र, नवले ब्रीजवरील सेल्फी पाँईटवर कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा, कारण त्याच्या ब्रेक फेलचे निशाण रस्त्यावर दिसून येत आहे. ब्रेक फेल झाल्याने ह्या ट्रकने इतरही वाहनांना धडक दिली, तसेच ट्रकने पुढे जाऊन कंटनेरला धडक दिली. मात्र, त्या कंटनेरच्या अलिकडे असलेली कार ट्रक आणि कंटेनरमध्ये अडकल्याची माहिती घटनास्थळावरुन पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या धडकेत कारने पेट घेतल्यानंतर ट्रकलाही आग लागली आहे. ब्रेक फेल झालेल्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाल्याचे समजते, सध्या अडकलेले लोक आणि वाहनांना बाहेर काढणे हे आमचे प्राथमिक काम आहे, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अपघात घडण्याचे कारण काय? (Reason behind Pune accident)
नवले पूलावर झालेला हा काही पहिला अपघात नाही, याआधीदेखील असे अपघात या ठिकाणी झाले आहेत. महामार्गाची चुकलेली रचना अपघातांचे मुख्य कारण असून साताऱ्याहून पुण्याला येताना कात्रज बोगद्यानंतर महामार्गाला तीव्र उतार आहे. याच ठिकाणी महामार्गावर धोकादायक वळण आहे, तसेच या ठिकाणीच दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रोड महामार्गाला येऊन मिळतात. तेव्हा तीव्र उतार असल्याने अनेकदा अवजड वाहनांचं नियंत्रण सुटतं, समोरच्या वाहनांवर ती अवजड वाहनं जाऊन धडकतात आणि अपघात घडतो. अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात, मात्र कोणताही कायमस्वरुपी तोडगा नाही, ही खेदाची बाब आहे. दरम्यान, एरवी लोकप्रतिनिधींचे भत्तेवाढ किंवा शासकीय निवासस्थानांच्या डागडुजीसाठी निधीबाबत एकमत होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लोकांचे जीव घेणाऱ्या या पुलावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी एकमताने पावलं टाकावीत, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
























