Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार?; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी आहे का? अशी चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत. पण पहलगाम हल्ल्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत आहेत. आज तर संजय राऊतांनी, शरद पवारांनी अमित शाहांचा राजीनामा का मागितला नाही? असा थेट सवाल केला. संजय राऊतांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य नाही, पण तर्कवितर्क सुरु आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेच्या (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance) पार्श्वभूमीवर ही टीका होत असल्यानं ठाकरे गट आघाडीतून बाहेर तर पडणार नाही ना अशी चर्चा रंगत आहे. राज ठाकरे परदेश दौऱ्याहून महाराष्ट्रात परत आलेत आणि उद्धव ठाकरे उद्या चार तारखेला परतणार आहेत. त्यामुळं दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा वेग येईल. एकत्र येण्याच्या या प्रक्रियेत दोघांनीही आपापले मित्र पक्ष दूर ठेवावे हा नक्कीच पहिला निकष असेल. उद्धव ठाकरे यांनी तर शिंदे आणि भाजपला दूर ठेवा अशी अटच घातलीय. त्यामुळं उद्धव ठाकरेंनाही काँग्रेस आणि शरद पवारांचा त्याग करावं लागेल. संजय राऊतांची गेल्या दोन दिवसांतली काँग्रेस आणि पवारांवरची टीका ही या त्यागाची सुरुवात तर नाही ना असा कयास बांधला जातोय.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर जेव्हा चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी देखील शरद पवारांना ठाकरे बंधूंच्या युतीवर माध्यमांशी प्रश्न विचारला होता. मात्र त्यावेळी शरद पवारांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर पुन्हा ठाण्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर माध्यमांशी प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर चांगलचं आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
घाई करू नका, थोडी वाट पाहा- देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यात काही वाईट नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. पण या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करू नका, थोडी वाट पाहा. ते दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ऑफर देणारे एक आणि त्याला प्रतिसाद देणारे दुसरे. त्यामुळे मी यावर जास्त काही बोलू शकत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.























