Sanjay Raut on Devendra Fadnavis: 'जनतेला कुत्रे, भाडे के टट्टू म्हणता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे'; देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांची घणाघाती टीका, म्हणाले, 'हे तर सुलतानाचे...'
Sanjay Raut on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील," अशा आक्रमक शब्दांत ट्रोलर्स आणि विरोधकांचा समाचार घेतला होता.

Sanjay Raut on Devendra Fadnavis: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai-Pune Expressway) महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनावरून (Landslide) महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. 7 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या मार्गावर दरड कोसळल्याने विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी "एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर हे लोक पैदा झाले असतील," अशा आक्रमक शब्दांत ट्रोलर्स आणि विरोधकांचा समाचार घेतला होता. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
Sanjay Raut on Devendra Fadnavis: हे सुलतानाचे राज्य
संजय राऊत म्हणाले की, "जनतेला मूर्ख बनवायचे आणि त्यानंतर हा प्रकल्प कोसळून पडतो. जनतेच्या कराच्या पैशाला भगदाड पडते आणि त्यावर जनता व्यक्त झाली, मग ते समाज माध्यमांवर असेल, वृत्तपत्रात असेल किंवा टीव्हीला असेल; तर जनतेला 'भाड्याचे टट्टू' किंवा 'कुत्रे' असे म्हणून त्यांची चेष्टा करायची? हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकते. हे सुलतानाचे राज्य आहे आणि त्यांच्यासोबत आजूबाजूला जे निजाम आहेत, ते काल फिदीफिदी टाळ्या वाजवत होते. लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील ही सुलतानशाही आहे."
Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या बदनामीचे षड्यंत्र दिल्लीतून
"महाराष्ट्राच्या बदनामीचे सगळ्यात मोठे षड्यंत्र जर कोणी रचले असेल, तर ते अमित शाहांनी (Amit Shah), नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) रचले आहे आणि 'खाण तशी माती' त्याच्या खाली देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्राची काय बदनामी केली? सत्य बोलणे ही महाराष्ट्राची बदनामी आहे का? तुम्ही विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात, कोरोना काळापासून सर्व विषयांवर; ते जरा तुम्ही एकदा स्वतः ऐकून बघा," अशी टीका त्यांनी केली.
Sanjay Raut on Devendra Fadnavis: ही महाराष्ट्राची बदनामी नाही का?
संजय राऊत पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रातील आमदार, खासदार 50-50 कोटींना विकत घेतले, ही महाराष्ट्राची बदनामी नाही का? तुम्ही आमदार-खासदार विकत घेतले त्यावर सरकार बनवले, यापेक्षा या राज्याची कुठली बदनामी झाली असे मला वाटत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. मालवणला भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, ही या राज्याची बदनामी नाही का? तो एक भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणून राज्यपाल होता. महात्मा फुलेंपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत त्यांनी जी वक्तव्ये केली, त्यांची बदनामी केली आणि तुम्ही त्याचे समर्थन करत होतात. ही महाराष्ट्राची बदनामी नाही का?" असा सवाल त्यांनी केला.
Sanjay Raut on Devendra Fadnavis: मिस्टर फडणवीस नैराश्यातून फावडे घेऊन बसलेत
"मिस्टर फडणवीस यांना यांना वैफल्य आले आहे. ते निराश, धळलेले आहेत. त्यामुळे जितके दिवस आपण या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी राहत आहोत, तितके दिवस ते फावडे घेऊन बसले आहेत, फक्त ठेकेदारांकडून पैसे काढायचे. काल त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेला 'भाडे के टट्टू' म्हटले, तुमच्या राज्यात रोज हत्या, अत्याचार होत आहेत, ही राज्याची बदनामी नाही का? विधानसभेत तुम्ही रोज खोटं बोलत आहात, ही राज्याची बदनामीच आहे. तुमच्या विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, ही राज्याची बदनामी आहे. तुमच्या विधानसभेत संविधानाच्या विरोधात जाऊन तुमचे विधानसभा अध्यक्ष निकाल देतात, ही राज्याची बदनामीच आहे," अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी जनतेची माफी मागावी
संजय राऊत पुढे म्हणाले की, "तुमच्या भ्रष्टाचारावर जनतेने बोट ठेवले तर ती जनता 'भाड्याचे टट्टू' किंवा 'कुत्र्यासारखी भुंकणारी' ठरते? ही आणीबाणी उधळून लावली जाईल. कोणताही स्वतःला जगज्जेता म्हणणारा या भूमीवर टिकला नाही. आरएसएसचा खरा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी वाचावा, खऱ्या इतिहासाचे पुस्तक मी त्यांना पाठवतो. महाराष्ट्राची जनता ही वाघ आहे, शूर आहे, आज ती शांत आहे. तुमच्यासारख्या चोऱ्यामाऱ्या करून सत्तेवर आलेल्या लोकांनी या राज्याची बदनामी केली आहे. तुम्ही सरळ मार्गाने सत्तेवर आलेले नाही, ही राज्याची बदनामी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या राज्याची माफी मागितली पाहिजे, त्यांना 'कुत्रा' आणि 'भाडोत्री' म्हटल्याबद्दल. या राज्याच्या स्वाभिमानी जनतेचा इतका घोर अपमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी केलेला नव्हता, यालाच वैफल्य म्हणतात," अशा कडक शब्दांत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतले.
आणखी वाचा
Before You Go
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला






















