MNS Shivsena UBT: मनसे-ठाकरे गटाच्या जागावाटपाचा 'श्रीगणेशा'; उद्धव ठाकरे राज ठाकरेंना किती जागा देण्यासाठी तयार?, महत्वाची माहिती समोर
MNS Shivsena UBT: सध्या जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाहीय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांच्या फेऱ्यांमध्ये ती चर्चा पुढे जाऊ शकते.

मंबई: आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात घडामोडींना वेग आला आहेस अशातच शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे या बंधूंच्या राजकीय युतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडल्याचं चित्र आहे. मुंबईत अखेर शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेला सत्तरच्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या (Thackeray) शिवसेनेची तयारी असल्याचं समजतंय. सध्या जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाहीय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांच्या फेऱ्यांमध्ये ती चर्चा पुढे जाऊ शकते. मनसेनं याआधीच ज्या प्रभागामध्ये ताकद आहे अशा 125 जागांची यादी तयार केलीय. त्यामुळे युतीमध्ये छोट्या भावाची भूमिका स्वीकारायला राज ठाकरे तयार होणार का, हा प्रश्न आहे.
MNS Shivsena UBT: बैठकांच्या काही फेऱ्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये होणार असल्याची माहिती
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा पुढे जाऊन या जागा वाटपाच्या बैठकांच्या काही फेऱ्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या तरी कुठलेही सूत्र दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर ठरलेले नसले तरी ठाकरेंची शिवसेना ही सत्तरच्या आसपास जागा मनसेला देण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेकडून साधारणपणे उमेदवार असलेल्या आणि लढू शकणाऱ्या तसेच ज्या प्रभागांमध्ये ताकद आहे अशा जवळपास १२५ लोकांची यादी तयार केली आहे. यापैकी जवळपास ७० जागा मनसेला सोडण्यास शिवसेना सकारात्मक असल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा पुढे जातील तेव्हा मनसे यावर समाधानी असणार का? जागा वाटपामध्ये वाटाघाटी होणार का? हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे.
उद्धव ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळं जागावाटपात जास्तीत जास्त जागा पक्षाला घ्यायच्या पण मनसेला कुठंही दुखवायचं नाही अशी रणनिती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची असण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळं राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कोणताही धोका पत्करणार नाहीत. जागावाटपाची यापूर्वी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. आता या दुसऱ्या फेरीत जागावाटपाच्या चर्चेत आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे.
























