Loudspeaker Row: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अनेकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता त्यांनी लाऊडस्पीकरच्या वादावरून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्या प्रश्नांना काही अर्थ नाही अशाच प्रश्नांवर चर्चा होत असल्याचे ते म्हणाले आहेत. देशाची वाटचाल विनाशाच्या दिशेने होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना ते असे म्हणाले आहेत.


मलिक म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना पुन्हा मैदानात उतरावे लागू नये, अशी भीती व्यक्त होत आहे. सरकारने शेतकऱ्यांना एमएसपीचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत ठोस पावले उचलली गेली नाहीत. ते म्हणाले, आज महागाई आणि बेरोजगारीवर प्रश्न विचारले जायला हवेत, पण लोकांनी त्याकडे लक्ष दिले नाही. पेट्रोल आणि डिझेलची अवस्था कोणी विचारत नाही, वाढत्या कराबद्दल कोणी बोलत नाही. ते म्हणाले, मी हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही आवाहन करतो की, हनुमान चालिसाच्या नावावर जे तुमच्यात फूट पाडत आहेत. त्यांचे ऐकू नका. भांडण सोडा आणि एकत्र या.  


दरम्यान, सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल राहिले आहेत. काश्मीरमधील घोटाळ्याबाबत त्यांनी गंभीर आरोप केले होते. ज्यात संघाच्या नेत्याचेही नाव होते. निवृत्त झाल्यावर आणखी अनेक खुलासे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकदा काश्‍मीरमध्ये दोन फायली त्यांच्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील एक फाईल अंबानींची तर दुसरी एका मोठ्या आरएसएस नेत्याची होती. त्यांनी ते दोन्ही सौदे रद्द केले, असं ते म्हणाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या: