मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रियाही राजकीय पक्षांनी चालू केली होती. फक्त निवडणूक आयोग या निवडणुकीची घोषणा कधी करणार याची सर्वांना प्रतीक्षा होती. दरम्यान, आता ही प्रतीक्षा संपली असून निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जारी केले आहे. 


असा असेल निवडणूक कार्यक्रम


निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होईल. त्याच दिवशी म्हणजेच 12 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचून जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना 2 जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 3 जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाईल. तर उमेदवारांना  आपला उमेदवारी अर्ज 5 जुलैपर्यंत मागे घेता येईल. 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. 12 जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.


खालील आमदार होणार निवृत्त


विधानसभेच्या आमदारांनी मतदानाच्या माध्यमातून नियुक्त केलेले विधानपरिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल. 27 जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या 11 आमदारांचा समावेश आहे.


महायुतीचा प्रयत्न यशस्वी होणार का ?


दरम्यान, आता विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे. भाजपचा पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिंदे गट आणि अजित पवार गटही प्रत्येकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत. याचाच अर्थ महायुती ९ जागांसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो.


हेही वाचा :


Maharashtra News Live update : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली!


Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी


Smriti Irani VS Priyanka Gandhi: वायनाडमध्ये प्रियंका गांधी विरुद्ध स्मृती इराणी लढत? भाजप 1999 ची रणनीति पुन्हा आजमावणार?