![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ravindra Waikar: शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांचं खळबळजनक भाष्य, नियतीने ही वेळ कोणावरही आणू नये
Maharashtra Politics: रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी घरातून निघाले होते तेव्हा ते प्रचंड भावूक झाले होते. उद्धव ठाकरे यांच्याविषयी वायकरांच्या मनात अजूनही सॉफ्ट कॉर्नर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
![Ravindra Waikar: शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांचं खळबळजनक भाष्य, नियतीने ही वेळ कोणावरही आणू नये I have no choice other than join Shiv Sena Shinde camp or I was in Jail says ravindra waikar Ravindra Waikar: शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकरांचं खळबळजनक भाष्य, नियतीने ही वेळ कोणावरही आणू नये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/10/fc6fd2d1ecbf594ac23423bf56b956491715313052415954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये, असे वक्तव्य शिंदे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी केले. रवींद्र वायकर यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे हे वक्तव्य पाहता रवींद्र वायकर हे शरीराने शिंदे गटात आले असले तरी मनाने ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच असल्याच्या चर्चा होत्या. वायकर यांच्या वक्तव्याने त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटानेही वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे रवींद्र वायकर लोकसभेची निवडणूक किती इर्ष्येने लढतील, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रवींद्र वायकर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला चुकीच्या प्रकरणात गोवल्यानंतर माझ्याकडे गजाआज जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय उरले होते. दबाव तर होताच, परंतु पत्नीचेही नाव गोवले गेल्यावर माझ्यापुढे पर्याय नव्हता. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, असे सांगत रवींद्र वायकर यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.
माझ्या हातातील शिवबंधन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून आहे व खांद्यावरचे शिवधनुष्यही. बाळासाहेबांच्या शिवसेनेत 50 वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांची साथ सोडावी लागली, तेव्हा एखाद्या कुटुंबसदस्याला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. परंतु नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला व नियतीच कसा बदल घडवून आणू शकते, ते सर्वांनीच पाहिले आहे, वायकर यांनी म्हटले.
रवींद्र वायकरांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे काय बोलणार?
रवींद्र वायकर यांनी स्पष्टपणे दबाव असल्यामुळेच आपण शिंदे गटात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे यांची गोची होऊ शकते. लोकसभेची उमेदवारी दिलेला नेता आपल्याला दबावाखाली शिंदे गटात प्रवेश करावा लागला, असे म्हणत असेल तर विरोधकांच्या दाव्याला आणखीनच बळ मिळू शकते. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले जात आहे, असा आरोप वारंवार विरोधक करतात. आता मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर यांच्या वक्तव्याचे भांडवल करुन विरोधक भाजप आणि शिंदे गटाविरोधात वातावरणनिर्मिती करु शकतात.
आणखी वाचा
जीवाभावाच्या सहकाऱ्यांची साथ सोडण्यापूर्वी रवींद्र वायकर गणपतीच्या दर्शनाला, उद्धव ठाकरेंचा विषय निघताच डोळे पाणावले
पत्नीचा रडवेला चेहरा, स्वत:ची हताश देहबोली; रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेश सोहळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)