आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, शिंदेंच्या आमदाराचा थोरातांना थेट इशारा; संगमनेरचा राजकीय वाद पेटला
संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी येथील हरिनाम सप्ताहात झालेल्या वाद वादानंतर राजकीय संघर्षाचा तिसरा अंक काल संगमनेरमध्ये पाहावयास मिळाला.

अहिल्यानगर : संग्राम महाराज भंडारे यांच्या किर्तनानंतर सुरु झालेला संगमनेर शहरातील राजकीय वाद आता टोकाला गेला आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात समर्थकांनी मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर, आज संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अमोल खताळ (Amol khatal) यांच्या नेतृत्वात महायुतीने मोर्चा काढत विरोधकांना लक्ष्य केलं. अमोल खताळ हे गुरुवारी रात्री एका सार्वजनिक कार्यक्रमानंतर बाहेर पडत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असली तरी आज या घटनेवरुन महायुतीने (Mahayuti) निषेध मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. यावेळी, झालेल्या निषेध सभेत पालकमंत्री विखे यांनी नाव न घेत बाळासाहेब थोरात यांना इशारा दिला, तुमची दहशत चालू देणार नाही, असे म्हटले. तर, आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत अशा शब्दात आमदार अमोल खताळ यांनी पुढील राजकीय संघर्षाचे सुतोवाच केले आहेत.
संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी येथील हरिनाम सप्ताहात झालेल्या वाद वादानंतर राजकीय संघर्षाचा तिसरा अंक काल संगमनेरमध्ये पाहावयास मिळाला. संग्राम भंडारे यांच्या वक्तव्यानंतर आजी-माजी आमदारांमध्ये सुरू झालेला संघर्ष अद्यापही शमलेला दिसत नाही. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार अमोल खताळ हे एका सार्वजनिक कार्यक्रमात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळीत धाव घेत हल्ला करणारा आरोपी प्रसाद गुंजाळ याला ताब्यात घेतलं. प्रसाद गुंजाळ याचेविरोधात हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर शहरात महायुतीच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या निषेध सभेत त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील सहभागी झाले होते. येथील सभेत आमदार अमोल खताळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातंवर निशाणा साधला.
हल्ल्याच्या घटनेचं राजकारण करू नये - थोरात
दरम्यान, या घटने संदर्भात काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य करताना या घटनेचा निषेध केला. मात्र, अशा घटनांचं राजकारण कोणी करू नये असा सल्ला विरोधकांना दिला. माझ्या सद्भावना शांती मोर्चात केलेल्या वक्तव्याला या घटनेची सोडू नये, असं देखील बाळासाहेब थोरात सांगायला विसरले नाहीत. हल्ला करणारा आरोपी नेमक्या कोणत्या पक्षाचा? यावरून संगमनेर शहरात सोशल मीडियावर महायुती व महाविकास आघाडीकडून अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. तर, बाळासाहेब समर्थकांच्या कॉल रेकॉर्ड देखील महायुतीच्यावतीने व्हायरल करण्यात येत आहेत. त्यामुळे, हल्ला करणारा आरोपी प्रसाद गुंजाळ याबाबत पोलीस तपासात काय ते निष्पन्न झाल्यावरच सत्य समोर येईल यात शंका नाही.























