Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...
Devendra Fadnavis on Adani: राज ठाकरे यांनी देशभरात अदानी समूहाचा झपाट्याने होत असलेल्या विस्ताराविषयी टीका केली होती. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

CM Devendra Fadnavis on Adani group growth: देशात 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर गौतम अदानी यांच्या समूहाने झपाट्याने प्रगती करत देशभरात हातपाय पसरले. भाजपच्या काळात फक्त अदानी समूहालाच (Adani Group) महत्त्वाचे प्रकल्प आणि जमिनी देण्यात आला. माझा उद्योजकांना विरोध नाही, पण फक्त एका उद्योजकाला वाढवण्याच्या प्रकाराला विरोध आहे, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले होते. त्यांच्या या टीकेला सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत प्रत्युत्तर दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी अदानींचा वकील नाही. राज ठाकरेंच्या टीकेला ते उत्तर देतीलच. मात्र, 2014 नंतर देशात फक्त गौतम अदानीच (Gautam Adani) नव्हे तर अनेक उद्योग समूहांचा विकास झाला, त्यांचे उत्पन्न कैकपटीने वाढले, असा प्रतिवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज ठाकरे सांगतात की, 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अदानींची नेटवर्थ वाढली. मी काही अदानींचा वकील नाही. पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, 2014 साली भारत हा जगातील 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आता 2026 साल उजाडेपर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. साहजिकच अर्थव्यवस्था वाढल्यानंतर देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ज्या कंपन्या यापूर्वी भांडवली बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) होऊ शकल्या नव्हत्या, त्या सूचिबद्ध झाल्या. देशातील प्रस्थापित उद्योगसमूहांनी प्रचंड विस्तार केला. या प्रत्येकाचे उत्पन्न आणि नफा प्रचंड वाढला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
2014 नंतर टाटा समूहाचे उत्पन्न 664, एचडीएफसी बँकेचे उत्पन्न 377 टक्के, अदानी समूह 686 टक्के, इन्फोसिस 280 टक्के, आदित्य बिर्ला ग्रूप 566 टक्के, भाती ग्रूप 266 टक्के, सन फार्मा 1552 टक्के, हिंदूजा ग्रूप 376 टक्के आणि एव्हेन्यू समूहाचे उत्पन्न 1166 टक्क्यांनी वाढले. सन फार्मा आणि एव्हेन्यू समूह या दोन्ही कंपन्या मुंबईच्या आहेत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज ठाकरे मुंबई आणि महाराष्ट्रात अदानी समूहाचे अनेक प्रकल्प आल्याचे सांगतात. पण अनेक काँग्रेसशासित राज्यांमध्येही अदानींचे प्रकल्प आहेत. ते सगळे वेडे आहेत का? हा जमाना असा आहे की, तुम्ही उद्योजकाला नाकारलं , गुंतवणूक नाकारली की ते लगेच दुसरीकडे जायला तयार असतात, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याला प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा






















