Devendra Fadnavis On Neelam Gorhe: देवेंद्र फडणवीसांनी नीलम गोऱ्हेंचे टोचले कान; म्हणाले, साहित्य संमेलनात बोलताना काही...
Devendra Fadnavis On Neelam Gorhe: साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हेंचे कान टोचले आहेत.

Devendra Fadnavis On Neelam Gorhe: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला होता. मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी हे विधान केलं होतं.नीलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाने नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सदर प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हेंचे कान टोचले आहेत. तसेच साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर कमेंट करणं योग्य नसल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. साहित्यिकांना वारंवार वाटतं राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नये. त्यांनी देखील पार्टी लाईनवरील कमेंट करणं योग्य नाही. त्यांनी पण मर्यादा पाळली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच नीलम गोऱ्हे त्या पक्षात होत्या. मी त्या पक्षात नव्हतो. त्यामुळे पक्षात काय चालायचं हे नीलम गोऱ्हे सांगू शकतात. मी कमेंट करु शकत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची भेट, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
एका लग्न सोहळ्यात पुन्हा ठाकरे बंधूंची भेट झाली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. ठाकरे बंधूंच्या या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. विसंवाद असू नये सुसंवाद असावा..सगळ्यांनी सुसंवाद करावा,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे शिकवलं तर राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना लगावला.
नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. (उबाठांच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असंही विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली.
























