नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) धामधुमीत सध्या रामटेक (Ramtek) मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. कारण या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे काँग्रेसला (Congress) येथे मोठा धक्का बसला आहे. जात पडताळणी समितीच्या (Rashmi Barve Caste Validity Certificate) या निर्णायनंतर आता निवडणूक आयोगानेदेखील त्यांचा अर्ज बाद ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अर्ज बाद झाला असला तरी बर्वे माघार घ्यायला तयार नाहीत.त्या निवडणूक आयोग आणि जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात दाद मागणार आहेत. विशेष म्हणजे या निर्णयानंतर त्यांनी भाजपवर सडकून टीका केली असून त्यांचा हा अत्याचार फार काळ चालणार नाही, असं बर्वे म्हणाल्यात.


बाजू मांडण्याची संधी दिली नाही


निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवल्यानंतर रश्मी बर्वे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली आहे.सत्तेत बसलेले हुकूमशाही पद्धतीने राज्य करत आहेत. त्यांच्या सत्तेचा माज समोर आला आहे. त्यांना एका मागासवर्गीय महिलेची एवढी भीती आहे. मला सकाळी उशिरा सुनावणीला बोलावण्यात आली. त्यासाठी उशिरा नोटीस देण्यात आली. माझी बाजू मांडण्याची संधी न देताच माझे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, असा दावा रश्मी बर्वे यांनी केला. 


मी घाबरणार नाही, मी अबला नाही


तसेच मी यांना घाबरणार नाही.. मी अबला नाही. महिला दुर्गेचे रुप असते. मी महिषासुराचा नाश करेन. माझे जात प्रमाणपत्र रद्द करणारे तुम्ही कोम. हे बेटी बचाव, बेटी पढावच्या गप्पा करतात. माझे जात प्रमाणपत्र रद्द करणारे ते कोण आहेत, असा हल्लाबोलही बर्वे यांनी केला. 


आम्ही सत्याच्या मार्गाने जाऊ


सरकार घाबरले आहे. पण आम्ही सत्याच्या मार्गाने जाऊ. आम्ही उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू. आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. न्यायालयातही न्याय न मिळाल्यास हे सरकार गोरगरिबांवर अन्याय करतेय, हेच सिद्ध होईल, असेही बर्वे म्हणाल्या. मी अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेत आहे. माझ्या जात प्रमाणपत्रावर तेव्हा का आक्षेप घेण्यात आला नाही, असा सवालही त्यांनी केला.


आता श्याम बर्वे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार?


दरम्यान, निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाला रश्मी बर्वे आज (29 मार्च) मुंबई उच्च न्यायालयाच्या आव्हान देणार आहे. आज शासकीय सुट्टी आल्याने न्यायाधीशांच्या घरी तत्काळ सुनावणी व्हावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केला जाणार आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूची जातीसाठी आरक्षित आहे. रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्जासोबतजे जात वैधता प्रमाणपत्र जोडले होते, त्याला जात पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्या आधारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद ठरावाला आहे. निवडणूक आयोगाने श्याम बर्वे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला आहे. त्यामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर श्याम बर्वे हेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा >>


काँग्रेसला मोठा धक्का! रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द, आता पुढे काय?