Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत म्हणाला...
Maharashtra Politics: भाजपच्या भरत जाधव या नगरसेवकाने पोलीस अधिकाऱ्यांसमोर विष प्यायले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकं काय घडलं?

नवी मुंबई: नवी मुंबईतील जिल्ह्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विषप्राशन केले. भरत जाधव असे या नगरसेवकाचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील (Raigad News) कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी विष पिण्याच्या आधी आपली फसवणूक झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येसारखे (Suicide News) टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही. विष प्यायल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र, ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
भरत जाधव यांनी व्हिडीओत नेमकं काय म्हटलंय?
मी आज प्रचंड मानसिक तणावात हे पाऊल उचलत आहे. कारण समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे की, तुम्ही प्रामाणिकपणे कामच करु शकत नाही. मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो, त्यामध्ये मला त्रास झाला. 25 वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे. चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं. रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, अडीच-तीन वर्षे त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन-तीन गाड्या साईटवर येतात, 30-40 पोरं उतरतात. त्यामुळे या बिल्डींगचं एकही बुकिंग होत नाही. आज जवळपास तीन-चार कोटी टाकून, बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहेत. सहन होत नाही, अशी ही गोष्ट झाली आहे. बँकेचे कर्ज आणि व्याज हे सुरु आहे. जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं, त्यांनी 90 लाख रुपये लावले आणि दहा-बारा महिन्यांत 60 लाख रुपये नफा घेतला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या, माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. त्यानंतर जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली. त्यामुळे आमच्या कंपनीला त्रास सहन करावा लागत आहे, आमची काहीही चूक नसताना.
नवी मुंबईतील एका नेत्याच्या प्रकरणातही असेच घडले, हे प्रकरण खूपच विचित्र आहे. मी नवी मुंबईत ज्याला लहानाचा मोठा केला, ज्याला नावारुपाला आणला, ज्याला समाजात वावरायचं शिकवलं, कामं घेऊन दिली, पैसे दिले. त्याचा हिशेब करताना एका राजकीय नेत्याच्या, कधी दुसऱ्याच्या आश्रयाला जायचं. या नेत्याला पाच लाख रुपये घेऊन एकाने भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव केले, काहीही संबंध नसताना. त्यांना राजाश्रय दिला, व्यवसायात पार्टनर झाले. त्यांचा काय व्यवसाय आहे माहिती नाही पण कोट्यवधींच्या जमिनी ते विकत घेत आहेत. बदनामी करायला, टार्गेट करायला मर्यादा असते. सरकारने नरेंद्र झुरानी यांनी केलेल्या कामाची आणि वॉर्ड नंबर 108 मधील केलेल्या कामांची चौकशी करावी. कर्जत-जामखेड तालुक्यात मी कोट्यवधी रुपये टाकून जमीन घेतली. यामध्ये अनेकांनी कमिशन घेतलं. दत्ता पवार, रुपेश पवार यांनी झाडाचे आणि रस्ता काढून देण्याचे पाच-सात लाख रुपये घेतले. आता माझ्याच जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला. जेणेकरुन मला जमीन विकता येऊ नये, असे भरत जाधव यांनी व्हिडीओत म्हटले आहे.
दत्ता घंगाळेंनी आरोप फेटाळले, चौकशी करण्याची मागणी
याबाबत दत्ता घंगाळे यांनी स्पष्टीकरण देताना आपला आणि भरत जाधव यांचे कोणतेही आर्थिक किंवा व्यावसायिक संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमचे कोणतेही राजकीय वैर नव्हते. माझ्या पत्नीने त्यांना धमकावले नाही. भाजपाचा युवक अध्यक्ष असताना नेमण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांपैकी कुणी मला पैसे दिले असल्याचे सांगितल्यास राजकीय संन्यास घेईल. मुख्यमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी दत्ता घंगाळे यांनी केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
