ठाणे: सांगलीच्या जागेनंतर आता भिवंडीतही (Bhiwandi Congress) महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिगणी पडताना दिसत आहे. राष्ट्रवादीने बाळ्यामामा म्हात्रेंना (Balyamama Mhatre) उमेदवारी जाहीर केल्यानतंर आता त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पैशांवाल्यांना जर उमेदवारी द्यायची असेल तर मग आम्ही काम करणार नाही असा पवित्रा घेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोध केल्याचं दिसतंय. आता वरून जरी आदेश आला तरी आम्ही काम करणार नाही, सर्वजण राजीनामा देऊन अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची असल्याचं जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितलं. 


काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे म्हणाले की,  कोकण विभागामध्ये आतापर्यंत आम्ही तीन जागा लढत होतो. मात्र यावेळी एकही जागा लढत नाही. कोकणात पंजामुक्त काँग्रेस असा प्रयोग करायचा आहे का? आमचा विरोध असतानाही राष्ट्रवादीने ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी आज एकत्र बैठक घेत असून पुढील भूमिका ठरवणार आहोत. 


काँग्रेस ही जागा का लढत नाही हे सांगावं


जर महाविकास आघाडी ही जागा काँग्रेसला सोडत नसेल तर आपण ही जागा का लढवत नाही हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भिवंडीमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांना सांगावं. जर काँग्रेसने ही जागा घेतली नाही आणि कार्यकर्ते म्हणाले की अपक्ष लढायच किंवा मैत्रीपूर्ण लढायचं तर तरीही आम्ही तयार आहोत. मात्र आम्ही आता टोकाची भूमिका घेणार आहोत असं दयानंद चोगरे यांनी सांगितलं. 


पैशावाल्यांना उमेदवारी द्यायची असेल तर आम्ही काम का करू?  


महेंद्र घरत यांनी राष्ट्रवादीच्या बाळ्यामामा म्हात्रे यांना विरोध केला आहे. ते म्हणाले की, कोकण काँग्रेस एकवटलेली आहे. आम्ही ⁠कोकणात दोन जागांची मागणी केली होती. पण महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी ⁠मुंबई आणि कोकण रिकामा करायचं ठरवलं आहे. ⁠चेनिथल्ला यांच्या केरळमधील गावी भेटलो आणि कोकणातल्या जागेचा आग्रह केला होता. आम्ही भिवंडीतून उमेदवारी भरणार असं त्यांना ठणकावून सांगतीलं आहे. 


पैशांवाल्यांना जर उमेदवारी द्यायची असेल तर मग आम्ही काम कशाला करु असा सवाल महेंद्र घरत यांनी विचारला. ते म्हणाले की, कोकणात कांग्रेसला एकही जागा मिळाली नाही, मग राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत का गर्दी करु? आता जरी वरून आदेश आला तरी आम्ही काम करणार नाही. ⁠सर्व पदाधिकारी राजीनामे देणार. 


राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून आमचे मतदारसंघ आमच्या हातून चालले आहेत, ⁠आणखी किती त्यांना डोक्यावर बसवणार? असा सवाल महेंद्र घरत यांनी विचारला. भिवंडीतून दयानंद चोरगेच उमेदवार असणार आहेत, आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत असंही ते म्हणाले. 


भिवंडीवरून वाद, शरद पवार गटाकडून बाळ्यामामा म्हात्रे रिंगणात 


सांगली आणि भिवंडी या दोन जागांवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद सुरू आहे. सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर तेच चित्र आता भिवंडीत असल्याचं दिसतंय. भिवंडीच्या जागेवरून वाद सुरू असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शरद पवार गटाकडून बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्याला आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. 


ही बातमी वाचा :