Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
Rohit Pawar: रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच, आपण अजित पवारांच्या निधनाबद्दल आणि विमान दुर्घटनेसंदर्भाने लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे म्हटले होते.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांत बारामती विमान अपघातावर (Baramati plane crash) अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांचे निधन झाले नसून विमानाचा अपघात झाल्यानंतर 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं. मग, विमान दुर्घटनेतून पाच जणांचेच मृतदेह कसे बाहेर आले? त्यात हे अजित दादा नसून दुसरीच बॉडी आणलीय, असे वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केलं होतं. तर, सोशल मीडियावरही अनेक प्रश्न आणि व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवार जिवंत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, दुर्दैवाने अजित पवार (Ajit pawar) जिवंत नाहीत, दादा परत येणार नाहीत, असे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांसह स्पष्ट केलं.
रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच, आपण अजित पवारांच्या निधनाबद्दल आणि विमान दुर्घटनेसंदर्भाने लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अजित दादांचा अपघात होता की घात असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे. लोकांनी भावनिक होऊन व्हिडिओ टाकले की दादा परत येतील. कारण, विमानात 6 जण होते आणि 5 जणांचे मृतदेह बाहेर आले. त्यामुळे, ती बॉडी दादांची नव्हती. दादा आज येतील, उद्या येतील असं अनेकांना वाटतंय. खरंच दादा परत आले तर मी दादांना घट्ट मिठी मारेन. दादांचा अपघात स्वप्न असल्याचा भास मला होत होता. पण, अपघाताच्या घटनास्थळी जेव्हा मी पोहोचलो, तेव्हा तिथे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सगळे निशब्द झाले होते, कुणाला काही बोलता येत नव्हतं. अपघात झाल्यानंतर दादाचा स्वेटर मी पाहिला, घड्याळ पाहिलं. अजित दादा नेहमी आपलं घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत होते, अपघातानंतर अजित पवारांच्या बंद घड्याळात 9 वाजलेले होते, अशी माहिती रोहित पवारांनी दिली. त्यामुळे, मला सर्वांना एवढच सांगायचं आहे की, जी घटना झाली नाही, दादांना काही झालं नाही असं आपल्या सर्वांना वाटतं. पण, तसे नसून ती घटना घडलीय. आज दादा आपल्यासोबत नसले तरी विचारांनी ते आपल्यासोबत आहेत, रोहित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी, त्यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनही केलं.
2 दिवस आधी सूरतला जाऊन आले विमान
सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी अजित दादांची क्रू तयारी झाली, 7 वाजून 3 मिनिटांनी बारामती येथी हवामान परिस्थितीचा आढावा घेतला गेला. सकाळी 8.73 ते 8.45 दरम्यान विमान दुर्घटना घडली असेल, असे रोहित पवार यांनी सांगितले. कारण, 9 वाजता अजित पवार गंभीर जखमी आहेत अशी बातमी समोर आली होती. तर, 9.45 वाजता अजित पवार गेल्याची बातमी समोर आली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. तसेच, हे विमान 2 दिवस आधी सुरतला जाऊन आले होते. याचे मालक म्हणाले, हवामानामुळे अपघात झाला असावा अशीही माहिती रोहित पवारांनी दिली. ग्रामपंचायत सीसीटीव्ही समोर आलं आणि त्यातून हवामान परिस्थिती समोर आली आहे. CCTV फुटेज पाहिल्यावर लक्षात येतं की, कंपनीच्या मालकाचा दावा पूर्णपणे खोटा ठरत असून यांत्रिक बिघाड झाला असावा हे स्पष्ट होतं असेल. मॅकेनिकल फेल्युअर झाले असेल का? विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आले होते का? रूटीन मेंटेनस झाला नव्हता का? असे प्रश्न उपस्थित होतं आहेत, असेही रोहित पवार यांनी म्हटले.























