Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. आज सोमवारी (दि. 06) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे महायुतीचे (Mahayuti) टेन्शन वाढल्याचे चित्र आहे. नाशिक लोकसभेतून (Nashik Lok Sabha Election) अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे. 


नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर लोकसभा लढवत आहेत. तर शांतीगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.  


शांतीगिरी महाराजांच्या माघारीसाठी महायुतीचे सर्वतोपरी प्रयत्न


शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र शांतीगिरी महाराजांचा माघार घेण्यास नकार असून ते अपक्ष लढवण्यावर ठाम असल्याची माहिती बाबाजी भक्त परिवाराकडून देण्यात आली आहे. शांतीगिरी महाराजांमुळे हेमंत गोडसेंना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता शांतीगिरी महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहतात की निवडणुकीतून माघार घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


विजय करंजकरांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल


दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर करंजकर यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी करंजकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.  करंजकरांच्या प्रवेशामागे बारगेनिंग झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आम्हाला काहीही फटका बसणार नाही, आमचा विजय निश्चित असल्याचा दावा ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी केला आहे. करंजकर गेल्याचा आनंदच असून आम्हाला त्यांचा त्रास होत होता, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


'मी रोज व्यायाम करणारा माणूस, चांगल्या चांगल्यांची तब्येत बिघडवेल', ठाकरे गटाच्या नाराज विजय करंजकरांचा रोख कुणाकडे?


भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटातील बडा नेता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, गोडसेंच्या अडचणी वाढणार?