नाशिक : खासदार संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपांना उत्तर देण्यासाठी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत 16 सप्टेंबरला मालेगावी मेळावा घेण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटीं रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोप केला होता. याच आरोपाला उत्तर देण्यासाठी गिरणा सहकारी साखर (Girana Sugar Fcatory) कारखान्याच्या सर्व सभासदांची बैठक मालेगावी बोलावण्यात आल्याचे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. 


शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गट बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली. यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून अनेकांवर आरोप करण्यात आले होते. यापैकी दादा भुसे एक. संजय राऊत यांनी ट्विट करत मोठा गौप्यस्फोट केला होता. यात त्यांनी लिहलं होत की, 'हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच  स्फोट होईल.' अशा आशयाचे ट्विट केले होते. यावर मंत्री दादा भुसे यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. 


दादा भुसे म्हणाले की, गेल्या दहा-बारा वर्षात मालेगाव तालुक्यातील गिरणा सहकारी साखर कारखाना डीआरटी कोर्टच्या माध्यमातून जाहीर लिलावाद्वारे त्याची विक्री झाली होती. आणि त्या विक्रीच्या काळामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शेअर्स गोळा केले होते. दुर्दैवाने मोठी रक्कम उभी राहू शकली नाही. त्यावेळी जमा झालेली रक्कम भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीला आरटीजीएस केली होती, असे भुसे म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी अनेकदा दादा भुसे यांच्यावर या संदर्भात आरोप केले आहेत. यात दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे संजय राऊत यांनी अनेकदा सांगितले. यावर आज दादा भुसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. 


संजय राऊतांना मेळाव्याचे आवाहन 


या संदर्भात 16 सप्टेंबर रोजी सर्व सभासदांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे दादा भुसे यांनी स्पष्ट केले. ज्यांनी आरोप केले, त्या मुंबईच्या भोंग्याला आणि ज्या स्थानिक भुंग्यांनी चुकीची माहिती दिली. त्यांनीही या बैठकीला उपस्थित रहावे असे, आवाहन भुसे यांनी केले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व उपनेते अद्वय हिरे यांचे नाव न घेता भूसेंनी आव्हान केले. मालेगावात 'शिवसेना आपल्या दारी' मेळावा संपन्न झाला असून शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करतांना मंत्री भुसे यांनी खा.राऊत यांचे नाव न घेता मुंबईचा भोंगा म्हणून संबोधले. तर उपनेते अद्वय हिरे यांना मालेगावचा भुंगा म्हणून उल्लेख केला.


इतर महत्वाची बातमी :