नाशिक : नाशिकच्या बागलाण (Baglan) तालुक्यातील गोपाळराव मोरे यांनी जीवाचं रान केलं, आयुष्यातील 30-35 पस्तीस वर्ष लढा देऊन, मुंबई- दिल्लीवाऱ्या करुन, तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना भेटून केळझर धरण मंजूर करुन आणलं. मात्र त्यानंतर जवळपास 29 वर्षांनी गोपाळराव मोरे यांचा संघर्ष पुस्तक रुपात जगासमोर आला. नाशिक येथील लेखक अभिमन्यू सूर्यवंशी (Abhimanyu Suryvanshi) यांनी जवळजवळ दोन वर्ष गोपाळराव मोरे यांचा संघर्ष समजून घेत 'कुण्या एकाची धरणगाथा' हे पुस्तक जगासमोर आणले. 


नाशिकच्या (Nashik) बागलाण तालुक्यातील चौंधाणे येथील चौथी पास शिकलेल्या गोपाळराव मोरे (Gopal More) यांची ही गोष्ट. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) दुष्काळ पडला होता. याची झळ बागलाण तालुक्यापर्यंत होती. याच दुष्काळात होरपळत असताना सामान्य कुटुंबातील गोपाळराव यांनी परिसरात धरण उभारण्याचा चंग बांधला. जवळपास 30 ते 35 वर्षे एकहाती लढा देऊन तालुक्यातील बावीस गावांना सुजलाम सुफलाम केले. 1981 ला धरण बांधून झालं. यानंतर काही वर्षांतच गोपाळराव मोरे यांचे निधन झाले. यानंतर क्रित्येक वर्ष हा संघर्ष इथल्या मातीतच होता. अखेर एक दिवस नाशिक येथील मूळचे बागलाण तालुक्यातील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अभिमन्यू सूर्यवंशी यांच्या कानावर गोपाळराव मोरे यांचे नाव पडलं. अन् हा दुर्लक्षित संघर्ष उजेडात आणण्याचे काम लेखक सूर्यवंशी यांनी पार पाडलं. याच संदर्भात लेखक अभिमन्यू सूर्यवंशी यांनी गोपाळराव मोरे (Kunya Ekachi Dharangatha) यांचा संघर्ष कसा शब्दबद्ध झाला, उलगडून सांगितलं. हा संघर्ष सांगताना त्यांचे डोळे भरुन येत होते. 


अभिमन्यू सूर्यवंशी हे पोलीस खात्यात नोकरीला होते. पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरुन 2002 साली निवृत्त झाले. मात्र पोलीस सेवेत असल्यापासूनच त्यांना लिखाणाची आवड होती. त्यामुळे कविता, लेख, कथा लिहित असत. त्यांनी 2004 साली माझ्या जीवनावरील आठवणी हे आत्मकथन लिहिले. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते नाशिक येथील प सा नाट्यगृहात त्याचे प्रकाशन पार पडले होते. सूर्यवंशी मूळचे बागलाण तालुक्यातील असल्याने त्यांचे येणे जाणे असायचे. असंच एके दिवशी स्नेही असलेले खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्यासोबत ते बागलाणला गेले. या ठिकाणी केळझर धरणातून (Kelzar Dam) सटाणा शहरात पाणी आरक्षित करण्यात आले होते. मात्र हे पाणी सोडण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करण्यात येत होता. शेवटी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचा निर्णय झाला. मात्र शेतकऱ्यांनी पोलिसांना न जुमानता पाईपलाईन तोडण्याचा प्रयत्न झाला. 


त्यावेळी बागलाण तालुका कळवण मतदारसंघात जोडला असल्याने येथील आमदार ए टी पवार होते. मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा रोष तसेच सटाणा येथील नागरिकांच्या विरुद्ध पाऊल उचलण्यास ते तयार नसल्याने तटस्थ होते. याच दिवशी खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रोष व्यक्त केला. ही सर्व गडबड सुरु असताना, स्थानिक गावकऱ्यांमधील एकाने उभं राहून आपला रोष व्यक्त करताना म्हणाला की, "अरे, तुम्ही सारे इथे स्वार्थासाठी एकमेकांच्या उरावर बसू लागला आहात, पण ज्या गोपाळ मोरेने हे धरण मंजूर करुन आणलं, त्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं, त्याचं शेत आजही कोरडंच आहे. त्याकडे कोण लक्ष देणार? सारे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे!" तरीही वादावादी चालूच राहिली. अखेर तोडगा न निघताच बैठक संपली. प्रतापदादा तिथूनच मुंबईला गेले, मी नाशिकला परतलो. ही 2010 सालची गोष्ट'. या बैठकीतून चर्चा करताना पहिल्यांदा गोपाळ मोरे यांचे नाव कानावर पडलं. त्या म्हाताऱ्याचे शब्द काळजापर्यंत भिडले. "ज्या गोपाळ मोऱ्याने हे धरण मंजूर करुन आणलं त्याचं शेत आजही कोरडंच." कोण हा गोपाळ मोरे? आणि त्याने धरण मंजूर करुन आणलं म्हणजे नेमकं काय केलं? हा माणूस लोकप्रतिनिधी होता की आणखी कोणी? धरणासाठी त्याने आपलं आयुष्य का झिजवलं? धरणाचा प्रस्ताव तयार करणं हे पाटबंधारे खात्याचं काम, त्यात या साध्या शेतकऱ्याचा काय संबंध? त्या दिवशी रात्रभर झोप आली नाही, दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा चौंधाणे गाठलं.! आणि खऱ्या अर्थाने गोपाळराव मोरे यांना शोधण्यास सुरुवात झाली. 


मी बागलाण तालुक्यातलाच, पण या गोपाळ मोरे यांच्याबद्दल लहानपणापासून मी काहीच ऐकलं नव्हतं. हा माणूस कधी होऊन गेला? याच्याबद्दल आपल्याला कधी कोणी सांगितलं कसं नाही? या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय चैन पडणं शक्य नव्हतं. मी पुन्हा एकदा चौंधाणे गाठलं. तिथल्या त्या वयस्कर आजोबांना भेटलो. गावातल्या इतर म्हाताऱ्या मंडळींना भेटलो. हळूहळू माहिती मिळत गेली. गोपाळ मोरे यांच्यासोबत इतर माणसाची नाव समोर येऊ लागली. त्या माणसांना भेटून गोपाळ मोरे यांच्याबाबतची माहिती गोळा केली. त्यामुळे आणखी शोधाशोध करण्याच्या मागे लागलो. गोपाळ मोरे यांच्या मुलांचे, नातवंडांचे पत्ते शोधून काढले. त्यांना भेटलो. त्यांच्याकडून ही सगळी हकीकत पुन्हा समजावून घेतली. त्यांच्याकडची कागदपत्रं मिळवली. त्यात गोपाळ मोरे यांनी धरणासाठी तहसीलदारांपासून पंतप्रधानांपर्यंत नाना ठिकाणी केलेले अर्ज होते, त्या अर्जांना आलेली उत्तरं होती, पाटबंधारे खात्याकडे पाठवलेल्या योजना होत्या. केळझर धरण परिसराचे नकाशे होते. गोपाळ मोरे यांच्या हस्ताक्षरातला मजकूर होता. त्यानंतर मग मी धरणाची कागदपत्रं मिळवायला सुरुवात केली. चौंधाण्याच्या परिसरात म्हाताऱ्या कोताऱ्यांकडून त्यांच्याबद्दलच्या आठवणी गोळा केल्या. बागलाणचा इतिहास वाचून काढला. यातून जसजशी गोपाळ मोरे यांची आजवर कुणालाच माहिती नसलेली कहाणी माझ्यासमोर उलगडत गेली. 


गोपाळ भाऊ भलता भला माणूस.... 


साधारण प्रत्येक गावात गेल्यानंतर 'गोपाळ भाऊ भलता भला माणूस, शेवटी इंदिरा बाईंनी न्याय दिला' अशा प्रतिक्रिया माणसं देत असत. याच दरम्यान गोपाळराव मोरे यांच्या जवळून संबंध आलेल्या अनेक लोकांनी इत्यंभूत माहिती दिल्याने पुस्तक लिहिण्यास खूप मदत झाल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. लेखक शंकर कापडणीस ज्यांच्याकडून गोपाळराव मोरे यांनी अनेक निवेदने लिहून घेतले. मुंजवाड येथील शिक्षक माधव मोरे यांनी गोपाळराव मोरे यांच्यावर एक लेख लिहिला होता, जो गावकरीमध्ये छापून आला होता, त्यांच्याशी भेटून अनेक माहिती मिळाली. विशेष म्हणजे गोपाळराव मोरे यांनी अनेक प्रसंग लिहून ठेवले होते. ते शिक्षक मोरे यांनी हे शोधून आणून दिले, गोपाळ मोरे यांचा इतिहास लिहण्यासाठी ते खूप उपयोगी पडले. याचबरोबर पाटबंधारे विभागाची खूप मदत झाली. विभागाकडून इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग जशाच तशा मिळाला. याचबरोबर डॉ. सरला धारणकर यांचे 'आदिवासी सेवक दादा बिडकर', जयकर यांचे 'इंदिरा गांधी', सुरेश पवार यांचे 'गिरणाकाठची माणसं' या पुस्तकांचा चांगला संदर्भ मिळाल्याचे अभिमन्यू सूर्यवंशी यांनी सांगितले. 


अखेर पुस्तक प्रकाशित झालं.... 


जवळपास वर्ष दीड वर्षांच्या फिरस्तीनंतर कुण्या एकाची धरणगाथा हे पुस्तक जगासमोर आले. समकालीन प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले. जानेवारी 2012 मध्ये पहिली आवृत्ती आली. यावेळी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. आतापर्यत चार आवृत्त्या झाल्या असून ज्यावेळी पहिली आवृत्ती आली. तेव्हा बागलाण तालुक्यात अनेक गावांना दिली. तेव्हा अनेक जणांच्या प्रतिक्रियांनी डोळे भरुन आले. 'आमचं जगणं सुकर करणारा हा माणूस विसरलो होतो, पण तुम्ही त्यांना जिवंत केलं, अशाही प्रतिक्रिया आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. अभिमन्यू सूर्यवंशी यांनी आतापर्यंत 'सांजवणी आत्मकथन, तीन कथासंग्रह, दोन प्रवासवर्णने, सहा चरित्रात्मक कथा' लिहल्या आहेत. ते शेवटी म्हणतात की, "सत्ताधारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्राधान्य क्रमात नसलेली परंतु जनतेला अत्यावश्यक असलेली एखादी गोष्ट आपल्याला लोकशाही व्यवस्थित मिळवायचे असेल, तर काय दिव्यातून जावं लागतं, ही बाब हे पुस्तक वाचणाऱ्या वाचकांना कळू शकेल. गोपाळ मोरेंना ज्या दिव्यातून जावं लागलं, तो अनुभव वाचकांसमोर आणावा आणि त्यातून आपण काही शिकावं, यासाठी हे पुस्तक लिहिलं असून एकूणच प्रशासन आणि राजकारण अधिक लोकाभिमुख करणं ही गोपाळ मोरे यांच्या भगीरथ प्रयत्नांना सलामी ठरेल."


इतर महत्वाची बातमी : 


Kelzar Dam Story : बागलाणचा मांझी! 35 वर्षे आंदोलन, पाच वेळा दिल्ली दरबारी, इंदिरा गांधींना भेटून धरण मंजूर केलं