Nashik MBA CET Exam : आज राज्यभरात अनेक केंद्रावर व्यवस्‍थापनशास्‍त्र शाखेतील एमबीए (MBA) या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा (MBA CET Exam) सुरू आहे. अशातच नाशिकमधील एका परीक्षा केंद्रावर एमबीए सीईटीच्या पेपर सुरु असताना तांत्रिक अडचण आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ वाया गेल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे. 


नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या नाशिक (Nashik) इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एमबीए सीईटी (CET exam) परीक्षेदरम्यान गोंधळ झाला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानूसार हॉलतिकीटवर अडीच तासाची वेळ होती. मात्र स्क्रिनवर 180 मिनिटे दाखवण्यात आली होती. तसेच परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन (Server Down) होऊन अनेक अडचणी देखील आल्या. दरम्यान अनेक जिल्ह्यातून 431 विद्यार्थी येथे दाखल झाले होते मात्र परीक्षेदरम्यान आलेल्या या अडचणीमुळे विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले होते. कॉलेज प्रशासनाला त्यांनी घेराव घातल्याने तणाव निर्माण झाला होता. 


दरम्यान पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchavati Police) अधिकारी आणि कर्मचारी दाखल होताच तणाव निवळला असून विद्यार्थ्यांकडून पोलिसांकडे तक्रारही देण्यात आली आहे. आमचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी किंवा गुण वाढवून देण्यात यावे अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. दरम्यान एमबीए सीईटी परीक्षेचा आज राज्यभरात पेपर होता. नाशिक शहरात देखील अनेक केंद्रावर ही परीक्षा होती. साधारण महा-एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षा ऑनलाईन सीबीटी मोडमध्ये घेतली जाते. तर एकूण परीक्षेचा कालावधी 150 मिनिटांचा असतो, यता एमएएच सीईटी परीक्षेच्या पॅटर्ननुसार, 4 विभागांमधून 200 प्रश्न विचारले जातात, मात्र यावेळी अडीच तासांचा पेपर असताना स्क्रिनवर 180 मिनिटे दिसून आली, तसेच पेपरच्या मध्ये तांत्रिक गोंधळ झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 


 नागपूर परीक्षा केंद्रावरही गोंधळ 


नागपूरच्या परीक्षा केंद्रावर तांत्रिक गोंधळ झाला आहे. यामुळे अनेकांना पेपर देता आलेला नाही. 9 वाजता या विद्यार्थ्यांचा पेपर होता. मात्र अद्याप अनेक विद्यार्थ्यांचा पेपर सुरु झाला नाही. हिंगणा रायसोनी येथील परीक्षा केंद्रावर हा गोंधळ झाला आहे. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरु आहे. परीक्षा केंद्रावर तांत्रिक गोंधळ झाल्याने येथील विद्यार्थी 8 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत. 9 वाजता परीक्षेची वेळ होती, मात्र हिंगणा रायसोनी येथील परिक्षा केंद्रावर अद्यापही विद्यार्थ्यांना पेपर दिला नाही. त्यामुळे विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.