Nashik Chhagan Bhujbal : 'कुठलाही कठीण प्रसंग असो बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) संयमानं उभे राहायचे आणि त्यांच्यासोबत सर्व शिवसैनिक उभे असायचे. त्यावेळी बाळासाहेबांनी शब्द दिला तर शिवसैनिक एकही शब्द न उच्चारता ते काम फत्ते करायचे. साहेबांचा शब्द सुटला, प्रश्न मिटला do or die होऊन राहायचं. हा एक पर्वणीचा शब्द घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक कामाला लागत असायचो, अशी आठवण छगन भुजबळ (Chhagana bHujbal) यांनी आज शिवसेनेच्या वर्धापनाच्या दिवशी बोलून दाखवली. 


आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन (Shivsena Anniversary) असून या पार्श्वभूमीवर आज छगन भुजबळ यांनी शिवसेनेसोबतच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी भुजबळ म्हणाले की, शिवसेनेला 57 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सर्व शिवसैनिकांना (Shivsena) शुभेच्छा देतो. सुरुवातीचे 25 वर्ष आजही आठवतात. शिवसेनेच्या पहिल्या मीटिंगपासून जायला लागलो. पहिले शाखाप्रमुख पाहिले झाले. त्यावेळी वर्धापन दिनानिमित्ताने माजगाव असेल, भायखळा असेल, परेल असेल, भोईवाडा, चेंबूर सगळीकडून शिवसैनिक एकत्र यायचो. त्यावेळी ट्रकच्या ट्रक भरून शिवतीर्थावर जमा व्हायचो. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण महत्त्वाच असायचं. दत्ताजी साळवे, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी त्याचबरोबर आम्ही सर्व शिवतीर्थावर हजर असायचो. शिवतीर्थ अगदी खुलून जायचं आणि तिथं बोलण्याची संधी मिळाली. 


दरम्यान 1973 मध्ये मी नगरसेवक झालो तर 1978 मध्ये शिवसेनेचा गटनेता झालो. त्यानंतर बाळासाहेबांनी बोलण्याची संधी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेने अनेक जबाबदाऱ्या दिल्या. महापौर झालो, आमदार झालो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शिवसेनेचे काम पोहोचवलं. मात्र काही महिन्यापूर्वी शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नसल्याची खंत भुजबळांनी बोलून दाखवली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन्ही गटाकडून चढाओढ सुरू आहे. त्यातच काल प्राध्यापक मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी कस काय प्रवेश केला आहे. हे अद्यापही सुटलेलं कोड आहे. गेल्या सात आठ दहा महिन्यांपासून त्या शिंदे विरोधात बोलत होत्या. त्यावेळी असं वाटलं की उद्धव ठाकरे बरोबर राहणाऱ्या महत्त्वाच्या कट्टर कार्यकर्त्या म्हणून मनीषा कायंदे शेवटपर्यंत सोबत राहतील. 


आमच्या मनात असेलली शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना. म्हणजे आता जे नाव दिलंय, ती बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, बाळासाहेब ठाकरेंची जी ओरिजनल शिवसेना आहे, ती आजही आमच्या मनात आहे. तीच कायम राहील. परंतु आता या दोन शिवसेनेमध्ये खरी शिवसेना कोणती हे लोक सांगतील. ज्यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात निवडणुका सुरू होतील, लोक ठरवतील की खरी शिवसेना कोणती ते, राजकारणात उणे दुणे होत असतात. काहीही उलट सुलट बोलत असलो तरी, लोक हे घरात बसून ठरवत असतात की चुकीचं काय आणि बरोबर काय? त्यामुळे तोपर्यंत सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा देत भुजबळांनी जय महाराष्ट्र केला. 


साहेबांचा शब्द सुटला, प्रश्न मिटला.... 


यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन होत आहेत. दुसरीकडे अनेक नेते ठाकरे गटाला सोडून जात आहे. यावर भुजबळ म्हणाले कि, जुना शिवसैनिक म्हणून वाईट वाटतं. कुठलाही कठीण प्रसंग असो बाळासाहेब ठाकरे संयमानं उभे राहायचे आणि त्यांच्यासोबत सर्व शिवसैनिक उभे असायचे. त्यावेळी बाळासाहेबांनी शब्द दिला तर शिवसैनिक एकही शब्द न उच्चारता ते काम फत्ते करायचे. साहेबांचा शब्द सुटला, प्रश्न मिटला do or die होऊन राहायचं. हा एक पर्वणीचा शब्द घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक कामाला लागत असायचो, मात्र नंतरच्या काळात शिवसेना हळूहळू विस्कळीत व्हायला लागली. त्यानंतर मी देखील काही कारणामुळे बाहेर पडलो. राज ठाकरे गेले, नारायण राणे गेले. अनेक लोक शिवसेनेला सोडून गेले. मात्र शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा असल्याचे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. 


उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील... 


दरम्यान ठाकरे गटातून अजूनही गळती सुरु आहे. अनेक महत्वाचे नेते सोडून जात आहे. या पार्श्वभूमीवर वडीलकीच्या नात्याने तुम्ही सल्ला देणं महत्वाच आहे, असा प्रश्न विचारल्यावर भुजबळ म्हणाले कि, ठाकरे गटाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरेंकडे आजही जुने नेते शिवसैनिक आहेत. जे चर्चा करू शकतात, ही गळती थांबू शकतात. त्यांना मी काय सांगावं असं मला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेले अनुभवी शिवसैनिक आहेत. या सगळ्यांनी एकत्रित बसून चर्चा करावी, त्यावर उद्धव ठाकरे योग्य ते निर्णय घेतील. त्यामुळे उद्धव ठाकरे हे जनता आणि शिवसेनेवर विश्वास ठेवून असून येत्या निवडणुकांत जनता शिवसेना कोणाची हे ठरवेल, असेही भुजबळ म्हणाले.