Nashik Onion Issue : राज्यात बीआरएसची (BRS) दमदार एन्ट्री झाली असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या 'कांदा ' (Onion Issue) प्रश्नावर हात घालत नाशिकमध्ये पायाभरणी केली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांदा खरेदीसाठी ' बीआरएस ' ची चाचपणी सुरू असून राज्य समन्वयक हर्षवर्धन जाधव यांनी बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात कांदा तेलंगणा राज्यात विक्रीसाठी नेण्याची घोषणा केली आहे. 


'अब की बार, किसान सरकार चा नारा देत राज्यात शिरकाव करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhr Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने आता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या कांदा प्रश्नांवर हात घालत नाशिक जिल्ह्यात आपला पाया भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाचे राज्य समन्वयक व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नाशिकच्या लासलगावातील उपबाजार असलेल्या विंचूर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या भेटी घेत कांदा तेलंगणातील हैदराबाद बाजार समितीत (Haiydrabad Bajar Samiti) पुढच्या आठवड्यापासून विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था करण्याची घोषणा केली. विंचूर बाजार समितीत झालेल्या कांदा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांच्या भेटीने बीआरएसने शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या कांदा प्रश्नावर हात घालत शेतकऱ्यांना दिलासा देत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत.


महाराष्ट्रात दर का मिळू शकत नाही.... 


विंचूर उपबाजार समितीत (Vinchur Bajar samiti) कांद्याला दर कमी मिळत असल्याने दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले होते. यावेळी शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यामध्ये कांद्याला दोन रुपयांपर्यंतचा दर मिळत असताना तो महाराष्ट्रात का मिळू शकत नाही, असा संतप्त सवाल केला होता. या आंदोलनाची सोशल माध्यमांत चर्चा झाल्यानंतर त्याची दखल घेत भारत राष्ट्र समिती पक्षाचे महाराष्ट्रातील समन्वयक व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट विंचूर येथे उपबाजार समितीला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विंचूर येथील कांदा तेलंगणा राज्यातील हैदराबाद बाजार समितीत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था पुढील आठवड्यापासून केली जाणार असल्याचे जाहीर करत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. 


तेलंगणात चांगला बाजारभाव.... 


दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथून शेतकऱ्यांचा कांदा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे पाठविला असता, 1900 ते 2000 रुपये इतका बाजारभाव 'मिळाल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी सरकार काही करत नसल्याने येथे कांद्याला बाजारभाव नसल्याचे जाधव यांनी सांगितले. कांद्याला 60 ते 70 हजार रुपये एकरी खर्च येत असल्याने आज मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्च तर सोडा वाहतूक आणि मजुरी निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. तेलंगणा राज्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्य किवा केंद्र सरकारने कांदा खरेदी करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.