Sant Nivruttinath Palkhi : 'सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम.... ज्ञानेश्वर माउली तुकाराम, असा हरिनामाचा गाजर करत राज्यभरातील दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. टाळ मृदुंगाच्या तालात, हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात असून कर्जत शहराजवळ दाखल झाली आहे. कालच्या मिरजगाव गावातील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी वडगाव मोरगाव मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून आज पारगावला मुक्कामी असणार आहे. 


गेल्या सोळा दिवसांपासून पंढरपुरला (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्याचे प्रस्थान झाले असून लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा सोळावा  दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. संत निवृत्तीनाथांची पालखी नगर जिल्ह्यात असून कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील मुक्कामानंतर नाथांची पालखी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. 


राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल वडगाव मोरगाव मुक्कामी होती. आज पालखीचा सोळावा दिवस असून आज पालखीने पारगावकडे मार्गक्रमण केले आहे. दुपारी चौसाळा गावातील  ग्रामस्थांकडून दुपारचे जेवण दिले जाणार असून त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी याच मार्गाने पुढे पारगावला मार्गस्थ होणार असून याच ठिकाणी विसावा घेणार आहे. 


आज पालख्यांचा मुक्काम कुठे?


संत निवृत्तीनाथांची पालखी आज अहमदनगर जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर पोहचली असून आज कर्जत तालुक्यात प्रवेश केला आहे. पुढे मार्गक्रमण करत मिरजगाव मुक्कामी असलेली संत निवृत्तीनाथांची पालखी पायी मार्गाने डिकसळ, चिंचोली, काळदाते, भैरोबाची वाडीमार्गे कर्जत शहरात मुक्कामाला पोहचणार आहे. तर संत निवृत्तीनाथांच्या पायी दिंडी पालखीने आतापर्यंत 259 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. बीड येथून पायी मार्गाने निघालेली संत मुक्ताबाईंनी पालखी पायी मार्गाने रौळसगाव, धोत्रा, चौसाळामार्गे पारगावला मुक्कामी असणार आहे. आतापर्यत मुक्ताईनगर पासून पालखीने तब्बल 308 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. आज दिंडी पारगावला मुक्कामी जाणार आहे.