Maratha Reservation : जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा, मराठा आरक्षणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadanvis : मनोज जरांगे यांच्यासोबत एक वैद्यकीय टीम असून जरांगे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई: मनोज जरांगे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी, मराठा आरक्षणाच्या प्रश्नी (Maratha Reservation) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष दिलं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांनी अन्न, पाणी आणि उपचार सोडले आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम त्यांच्या सोबत आहे. त्यांचा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जरांगे पाटलांसोबत असणाऱ्यांनी त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलं असून जो काही योग्य निर्णय असेल तो घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. मला वाटते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा.
आम्ही नेहमीच अलर्टवर असतो
केरळमध्ये झालेल्या बाँबस्फोटानंतर राज्यातील सुरक्षेविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, आपण नेहमी अलर्टवर असतो. वेगळा कुठलाही अलर्ट दिला नाही. जे काही केरळमध्ये घडलेलं आहे त्याची सगळी माहिती निश्चितपणे आपल्यापर्यंत देखील पोहोचेल. मुंबईसारख्या, पुण्यासारखी अत्यंत महत्त्वाची शहरं आपल्याकडे असल्याने निश्चितपणे दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवून असतो.
मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवलीय. मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर काही उपयोग नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तर सरकारकडे दोनच पर्याय राहिलेत मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा मराठ्यांशी सामना तरा, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला.
सांगलीत सर्वपक्षीय आमदार-खासदारांचे एक दिवसाचे उपोषण
सांगलीतील सर्व खासदार, आमदार सोमवारी उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षण आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लोकप्रतिनिधी एक दिवसाचं उपोषण करणार आहेत. मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांची भेट घेत आरक्षणाबाबत जाब विचारला होता. तसंच जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी आंदोलकांना केली होती.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
