मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयची टीम सीन ऑफ क्राईम रिक्रिएट करणार आहे. यासाठी सीबीआयने सर्व सामानही सोबत आणलं आहे. यावेळी सीबीआयने मुंबई पोलिसांच्या टीमला बाहेर उभं राहण्यास सांगिलं आहे, अशी माहिती मिळत आहे.


सीबीआय अधिकार्‍यांकडून सुशांत राहत असलेल्या अपार्टमेंटची पाहणी सुरु आहे. काही अधिकाऱ्यांनी इमारतीच्या शेवटच्या फ्लॅटवरील गच्चीवर जाऊन देखील संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे. सुशांत राहत असलेल्या खोलीत फॉरेन्सिक लॅब डॉक्टर्सही पोहोचले आहेत. सीबीआयच्या टीमने सिद्धार्थ पिठानी, दीपेश आणि नीरज यांना सोबत आणलं आहे. घटना घडली त्यावेळी सिद्धार्थ, दीपेश आणि नीरज सुशांतसोबत उपस्थित होते.


सीबीआयने काल या प्रकरणी आपला तपास सुरु केला. काल सीबीआयच्या टीमने सुशांतचा कूक नीरजची जवळपास 14 चौकशी केली. यावेळी 40 पानांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला.


या प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकारण अजूनही सुरुच आहे. बिहारचे भाजप प्रवक्ते निखील आनंद यांनी दिशा-सुशांत यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीची मागणी केली आहे. निखील आनंत यांनी म्हटलं की, दीशा आणि सुशांतचा मृत्यू संशयास्पद आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या इशाऱ्यावरून मुंबई पोलीस हे प्रकरण बंद करण्याच्या मागे आहे. तसेच सुशांच्या मृत्यू प्रकरणातील संशयितांचं मुंबई पोलिसांशी असलेली जवळीक संशयास्पद आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या चौकशी मागणी निखील आनंद यांनी केली आहे.


संबंधित बातम्या