मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आपल्याच राज्याचे लोक आपल्या पोलिसांची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हे महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा घणाघात देखील राऊतांनी केला. आज सुप्रीम कोर्टात निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी अतिशय सावध भूमिका मांडली आहे. या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या युवा नेत्यांचं नाव वारंवार घेतलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय असणार? याकडे सर्व पक्षाचं लक्ष लागलं होतं. सीबीआयकडे तपास जाणं हा मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी मोठा धक्का आहे. आमच्या पोलिसांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरु असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी देत महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे.


संजय राऊत काय म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही. ही कायदेशीर आणि न्यायालयीन बाब आहे. यावर महाधिवक्ता आणि मुंबई पोलीस आयुक्त बोलू शकतील असं राऊत म्हणाले. महाराष्ट्र राज्य हे न्याय व सत्यासाठी संघर्ष करणारे राज्य आहे. कुणावरही अन्याय करणारे राज्य नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, हे एक षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांना आपल्याच राज्याचे राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचे खच्चीकरण करतायत असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणं म्हणजे ज्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्यांनी घटना निर्माण केली, त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं देखील संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.


शिवसेनेचा या प्रकरणाशी काय संबंध?


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या एका युवा नेत्यांचा समावेश असल्याचा सोशल मीडियावर विरोधकांकडून आरोप करण्यात आला. भाजपकडून वारंवार शिवसेनेच्या नेत्यांचा संबंध असल्याची वक्तव्य करण्यात आली. याच युवा नेत्याला पाठीशी घालण्यासाठी मुंबई पोलीस काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळेच हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केल्यानंतर या प्रकरणाकडे आणखी संशयाने पाहण्यात आलं.


संबंधित बातम्या




CBI Probe in SSR Case | सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार