Mumbai Water Taxi : भारतात पहिली वहिली वॉटर टॅक्सी आता प्रवासासाठी नागरिकांना वापरता येणार आहे. आज दुपारी मुंबई ते नवी मुंबई प्रवासासाठी या वॉटर टॅक्सीचे उद्घाटन करण्यात आले.  या जलवाहतूकीसाठी गेले काही महिने सर्वच जण प्रतिक्षेत होते. पण हा प्रवास सुखकर आणि पर्यावरण पूरक असला तरी बेलापूर ते भाऊचा धक्का हा प्रवास स्पीड बोटने करण्यासाठी प्रति प्रवासी तब्बल 800 ते 1200 रुपये किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे या फेरीच्या उद्घाटनादिवशीच नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. दरम्यान हे भाडे कमी करण्यासाठी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सरकारला साकडे घातले आहे.


देशात आता ही पहिली वॉटर टॅक्सी नवी मुंबईकरांसाठी उपलब्ध होत आहे. नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी हा प्रवास किती आरामदायक आणि नयनरम्य असला तरी तो खिशाला परवडणारा नाही. कारण या वॉटर टॅक्सीसाठी प्रतिप्रवासी 800 ते 1200 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई ते नवी मुंबई प्रवासाकरता स्पीड बोट आणि कॅटामरान बोट या दोन सेवा उपलब्ध असतील. यात बेलापूर ते भाऊचा धक्कादरम्यान स्पीड बोटसाठी एकेरी भाडं 825 आणि 1210 रुपये मोजावे लागतील, तर कॅटामरन बोटसाठी एकेरी भाडं 290 रुपये असणार आहे.  स्पीड बोटीच्या मासिक पास तर तब्बल 12 हजार 100 रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान या सर्वामुळे नागरिकांच्या खिशाला चटका लागणार असल्याने राज सरकार याबाबत काय नवे निर्णय घेणार का? हे पाहावे लागेल.


इतर सेवा अधिक किफायती


नवी मुंबईतून मुंबईत जाण्यासाठी लोकल ट्रेनने 15 ते 20 रुपये मोजावे लागतात. तर बेस्ट प्रवासासाठी 15 ते 35 रुपये मोजावे लागतात. याशिवाय खासगी कार सेवेसाठी 500 ते 600 रुपये लागतात. पण या वॉटर टॅक्सीला तर 800 ते 1200 रुपये लागत असल्याने अर्धा ते पाऊण तास वेळ वाचविण्यासाठी तब्बल 500 ते हजार रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. शिवाय वॉटर बोटनं भाऊच्या धक्क्यावर उतरावं लागणार आणि तिथून पुन्हा प्रवासाठी इतर पर्याय शोधावे लागणार ते वेगळेच. 


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha