निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला : मनसे
सध्या देशामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. इथे होणाऱ्या प्रचार सभांना मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातून जे लोक तिथे गेले आहेत, त्याच्यावर निर्बंध घालावेत, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.

मुंबई : निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला, अशी मागणी मनसेने केली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूमधून येणारे नागरिक सुपर स्प्रेडर ठरु शकतात, असं मतही मनसेने मांडलं आहे. राजकीय सभांमध्ये होणाऱ्या गर्दीवर बोट ठेवत मनसेने ही मागणी केली आहे.
मनसे नेते बाळा नांदगावरकर यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.
राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 9, 2021
सध्या देशामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. इथे होणाऱ्या प्रचार सभांना मोठी गर्दी होत आहे. जर हे नागरिक महाराष्ट्रात आले तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षणविरहीत रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लावावेत, क्वॉरन्टीनचा कालावधी असो चाचणी याबाबत कठोर नियमावली लागू करावी. त्यामुळे निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातून जे लोक तिथे गेले आहेत, त्याच्यावर निर्बंध घालावेत, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.
परप्रांतातून येणारे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीसाठी जबाबदार : राज ठाकरे
याआधी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गासाठी परप्रांतीय जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरे म्हणाले होते की, "कोरोना फक्त महाराष्ट्रातच का दिसतो? त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका, शेतकऱ्यांचे मोर्चे सुरु आहेत, तिकडे कोरोना, किंवा लाटा नाहीत. हे महाराष्ट्रातच सर्व सुरु आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना असल्याचं चित्र आहे. त्याचं एक कारण म्हणजे बाहेरुन येणाऱ्यांची संख्या आणि दुसरं म्हणजे तिकडे कोरोनाचे पेशंट मोजले जात नाहीत, त्यामुळे ते आकडे समोर येत नाहीत. तिथे मोजले तर असेच आकडे समोर येतील."























