एक्स्प्लोर
स्वाधीन क्षत्रिय निवृत्तीनंतरही सरकारी बंगल्यातच!

मुंबई : मुंबई-ठाण्यात मालकी हक्काची घरं असूनही राज्याच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना सरकारी निवासस्थानाचा मोह टाळता येत नाही. असाच एक प्रकार राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याबाबत समोर आला आहे. वांद्रे आणि नेरुळमध्ये मालकीची घरं असूनही स्वाधीन क्षत्रिय यांनी अद्याप शासकीय निवासस्थान सोडलं नाही. शिवाय, त्यांनी त्याबदल्यात आणखी एका नवीन निवासस्थानाचा हट्ट धरल्याचं कळतं आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त होऊनही स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयासमोरचा आलिशान शासकीय बंगल्याचा ताबा सोडलेला नाही. याउलट सेवा अधिकाराच्या आयुक्तपदी वर्णी लागल्यानंतर ते 'सारंग' या शासकीय इमारतीत दोन नवीन फ्लॅटची मागणी करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. स्वाधीन क्षत्रिय यांच्या वार्षिक विवरण पत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालकीची दोन घरं मुंबई आणि नेरुळमध्ये आहेत. या घरांच्या भाड्यातून त्यांना 20 लाखांची वार्षिक मिळकत होते. मात्र, तरीही मुंबई-ठाण्यात मालकी हक्काची घरं असून काही आजी-माजी अधिकारी 2008 सालच्या जीआरचा दुरुपायोग करून अनधिकृतपणे शासकीय निवस्थानावर कब्जा करून बसतात. एकीकडे सर्वसामान्य मंत्रालयीन कर्मचारी मुंबई बाहेरून नोकरीसाठी तासंतास प्रवास करून आपलं आयुष्य घालवतो तर दुसरीकडे आजी-माजी अधिकारी नियमांची पायमल्ली करून सर्रास मोक्याच्या ठिकाणच्या शासकीय निवासस्थानावर वर्षोनुवर्षे कब्जा करून बसतात. त्यामुळे सरकार कोणाचंही असलं तरी सत्तेचा पुरेपूर उपभोग असे अधिकारी घेतात हे स्पष्ट होतं आहे.
आणखी वाचा























